Friday, October 23, 2020

साद-प्रतिसाद भाग १

                  साद प्रतिसाद              
*गहिरी साद* 

 लेखिका---*© चित्कला कुलकर्णी.          

प्रिय,
      खरं सांगू ?  परवा बऱ्याच दिवसांनी तुझा अनपेक्षित फोन आला. मी तर हुरळूनच गेलो, अधीर झालो. अगं, किती वाटायचं .... तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात म्हणून... !! तू म्हणालीस, "कसा आहेस?.." तुझ्या एवढ्या शब्दांनी डोळ्यांत टचकन् पाणी तरळलं. पण, पुढं तू तुझ्या बढतीची बातमी दिलीस. मला आनंदच झाला. क्षणभर वाटलं, तू खास माझ्यासाठी वेळ काढून बाहेर फिरायला चल.. असं म्हणतेस की काय...अगदी पूर्वीसारखं ..पुढं तू मला मोठ्या आनंदात विचारलंस, "तुला काय हवंय?"  मीही तुला उलटपक्षी विचारलं, "तुला नेमकं काय हवंय?"(पण, मनातच हं!) मी हसून वेळ साजरी केली.
        तुला खरं खरं सांगू ??  असं विचारण्यापेक्षा अंतर्मनातले अव्यक्त साद प्रतिसाद ओळखता आले असते तर!  साद प्रतिसादाची भाषा उपजावी लागते... उमजावी लागते नां गं ! हो, मला जे हवं होतं आणि अजूनही हवंय त्यात मी गुरफटून राहिलो नाही, इतकंच. तू मला पूर्वी जशी होतीस तशीच हवी आहेस. मी हे अगदी खरं खरं लिहीत आहे. विश्लेषण कशाला करू ? आणि त्यानं साधणार तरी काय गं! आपणच आपल्याला पारखं झाल्यासारखं नाही का वाटत?

आपण खरंतर शाळेपासून एकत्र होतो. तू पूर्वीपासूनच तशी अबोल. शांत, विचारी आणि ध्येयनिष्ठ. पण, जेव्हा बोलशील तेव्हा अचूक, सडेतोड. तुझ्या ह्याच गुणांवर मी भाळलो.  तरुणाईतल्या माझ्या त्या सादाला तुझा संयत प्रतिसादही मिळत गेला. एकत्र येण्याचा विचारही आपण केला होता. पण , हळूहळू तू तुझ्या कार्यक्षेत्राशी समरस होत गेलीस. तुझं कार्यक्षेत्र  रुंदावलं. माझी साद मूक होत गेली. अन् अनामिक हुरहूर तेवढी काळजात  राहिली..
   तुला आठवतं ??  एकदा आपण  नदीकाठी भेटायचं ठरवलं होतं. तुझ्या आवडीचा निशिगंध मी घेऊन  वाट पहात होतो. पण अचानक तुझा बेत बदलला. अत्यंत महत्त्वाच्या कामामुळं तू येऊ शकणार नाहीस असा  खूप उशिरा फोन आला. निराश झालो. एवढं काय महत्त्वाचं काम असेल असा विचारही मनात आला. पण तेव्हाच ठरवून टाकलं, इथून पुढं फार स्वप्नं रंगवायची नाहीत. भूतकाळातही  फार  रमायचं नाही. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही अत्यंत महत्त्वाचे क्षण येतात की त्या व्यक्तीकडून आपल्याला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर निराशा येते. त्यापेक्षा जे घडलं ते थोडं दूर ठेवता आलं पाहिजे नाही का ? तो विचार मनात रेंगाळत राहिला तर रंगवलेल्या स्वप्नांचा रंग उगाच फिका होत जातो. हं... ..!! वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकीन उसे इक खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा...
   पुढं  तू एका पाठोपाठ पदव्या, सुवर्ण पदकं मिळवत गेलीस. तुझ्या कार्यक्षेत्रात एक एक पायरी चढत अगदी उच्च पदावर पोहचलीसही. मला तुझं खूप कौतुक वाटायचं आणि आजही तितकंच वाटतं. पण, हे सगळं मिळवता मिळवता तू आत्ममुग्ध होत गेलीस की काय असा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. मला कधी कधी वाटायचं की तुझं मन मला समजलंच नाही त्यामुळंच तर  माझी साद पोहचत नसेल का ?
   एकदा नं, आपल्या आवडत्या ठिकाणी असाच एकटा बसलो होतो.  पश्चिम क्षितिजाकडे नजर गेली. नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात आकाशातल्या बदलत्या रंगांचं प्रतिबिंब दिसत होतं. आकाशातल्या मूळ रंगांपेक्षा  प्रवाहातले रंग वेगळेच असतात बघ. एक अगदी ओळखीचा हवाहवासा वाटत असतानाच तो बघता बघता अनोळखी होऊन जातो. तोपर्यंत दुसरे रंग उमटतात आणि  येणारे तरंग त्यांना उठाव देतात. मनाचं असंच असेल का गं ?
    माझं म्हणशील तर एका लयीत आयुष्य सुरू आहे. माझ्या कार्यक्षेत्रात कुठं थांबायचं हे मी ठरवल्यामुळं मला माझ्या छंदांना वेळ देता येतो. आस्वाद घेत चालू आहे. तरीही, तुझी आठवण  मनात सतत ताजी असते. आज काही वर्षांनी जेव्हा पुन्हा शांतपणे तुझा  विचार केला तेव्हा माझंच मला हसू आलं. अगदी पहिल्यांदा तुझ्याबद्दल  सहेतुक पण काहीसं वेगळं वाटायचं .आताही ओढ आहेच पण त्यात निर्हेतुक आपलेपणा आहे.. पूर्वी आपण बऱ्याचदा भेटत असू. प्रत्येक भेटीत मी मनात काही निर्णय घेत होतो. पण, माझ्या अव्यक्त सादाला  हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तू म्हणशील, मीही एका प्रतिसादाची अपेक्षा केली होती आणि तो मला मिळाला नाही.
यावर मी काय बोलू ?
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणं, साद प्रतिसादाची भाषा प्रथम उपजावी लागते, उमजावी  लागते. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन काही वेळा  या भाषेपुढे जाऊन निर्णय घेता आले पाहिजेत...
   आजच सकाळी तुला फोन केला होता. कदाचित तू महत्त्वाच्या कामात असशील. म्हटलं पत्र लिहून पाठवू. इतर कागदपत्रं पहाताना नक्कीच हे पत्र वाचशील.
पत्र पूर्ण करून पेन ठेवणार एवढ्यात तुझा फोन आला.. ( तुझं बोलणं झाल्यावर मी मोठ्या आनंदानं हे पुढंचं लिहून पूर्ण करतो.) नेहमीप्रमाणं कामातली प्रगती सांगितलीस. मीही कौतुक केलं. सहजच तू विचारलंस, " काय करतोस ?" मी म्हटलं "तुझ्याशीच बोलतोय पण पत्रातून. तुला फारसा वेळ नाही नां मिळत म्हणून.." तुला मोकळा वेळ मिळाला होता. आणि तू पत्र वाचून दाखवण्याचा आग्रह धरलास. मीही वाचून दाखवलं आणि तू तडक यायला निघालीस... माझ्या काळजात झिणझिण्या आल्या. तुझ्याशी कसाबसा बोललो खरा...मला आतून खूप भरून आलं गं...हा जो तुझा येण्याचा निर्णय होता तो साद प्रतिसादाच्या भाषेपुढचा होता नां.. ?
बस्स !!!  मिळाला मला ....
   ----तुझाच , (असं म्हणण्याची     आवश्यकता आहे का ??)
     Chitkala.kulkarni20@ gmail.com
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
              साद-प्रतिसाद
लेखिका-सौ.स्मिता शिरीष कुलकर्णी
      हे दिसायला सोपे शब्द असले तरी त्याबद्दल लिहायला घेतल्यावर विचारांचा नुसता गुंता होऊ लागला. ग्रुप वर बर्‍याच जणांचे लेखही वाचले, पण फक्त एखाद्या सादेला प्रतिसाद देणे इथे ही व्याख्या संपते का? एका आईच्या हाकेला बाळाचा प्रतिसाद ,डॉक्टरांच्या उपचारांना पेशंटचा प्रतिसाद, हा प्रतिसादच असतो. पण एवढाच संकुचित अर्थ असू शकेल का? म्हणून मग मी शब्दकोशही चाळला. त्यातही ' प्रतिक्रिया 'असाच शब्दार्थ आहे. मग प्रतिक्रिया हा शब्द असताना प्रतिसाद हा शब्द कसा आला असेल? जरा खोलात जाऊन विचार करताना लक्षात आले की साद म्हणजे sound किंवा voice आणि प्रति म्हणजे copies,  नकल. म्हणजेच repeatation of sound is प्रतिसाद. जसे ध्वनी /प्रतिध्वनी .आपणच उच्चारलेला शब्द जसा दरीतून आपल्याला पुन्हा ऐकू येतो. क्रिया-प्रतिक्रिया एखाद्याने भेटल्यावर हात जोडले की समोरचा तसेच करतो. मला वाटते साद/ प्रतिसादाचा ही अर्थ तसाच होतो. एखाद्या गोष्टीसाठी साद घातली आणि ती पुन्हा पुन्हा उच्चारली गेली म्हणजेच ती मनात रुजवली जाते, त्याला प्रतिसाद म्हणतात.
उदाहरणार्थ महात्मा गांधींनी इंग्रजांना 'भारत छोडो 'असा हुकूम दिला ,पण हे शब्द केवळ गांधीजींचे न राहता,  लाखो जनसमुदायाच्या तोंडून उच्चारले गेले तेव्हा ती प्रसिद्ध अशी 1942 ची 'चले जाव 'चळवळ झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे इंग्रजांनी हिंदुस्थानातून परत जायच्या प्रक्रियेला सुरुवात केली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हर हर महादेव' ची घोषणा केली पण जेंव्हा  हजारो मावळ्यांच्या तोंडून, दऱ्याखोऱ्यातून 'हर हर महादेव 'दुमदुमू लागले तेव्हा  स्वराज्यासाठी सर्वांनाच स्फुरण चढले.म्हणजे केवळ एका सादे मुळे नाही तर हजारो प्रतिसादामुळे त्याला वजन आले.
तीच गोष्ट' वंदे मातरम 'ची !समूहाने जेव्हा वंदे मातरम चा घोष सुरु होतो तेव्हा माणसांच्यातच  नाही तर हवेतही एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते. हाच तो साद-प्रतिसाद याचा परिणाम! असा परिणाम होण्यासाठी सामर्थ्यवान शब्दांची आणि खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असते, ज्यांच्या सादेला योग्य व अपेक्षित प्रतिसाद मिळतो.
पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर माननीय नरेंद्र मोदींचे' मेरे प्यारे देशवासियों' आणि ' स्वच्छ भारत अभियान 'हे आजही प्रत्येकाच्या तोंडून सतत ऐकू येते. त्यांच्या सुरुवातीच्या भाषणातून सतत हे ऐकल्यामुळे त्याचा प्रतिसाद उमटला तो लोकांच्या क्रियेतून! परदेशात दिसणारी स्वच्छता आपल्या देशात यायला 100 वर्षे लागतील असे म्हणणारे आज देशाच्या स्वच्छतेसाठी पुढे सरसावलेले दिसतात .100 वर्षाची ही पोकळी 5 वर्षात भरून आलेली दिसते.
आता त्यांनी साद घातली आहे 'आत्मनिर्भर भारत 'आणि ' Make in India' ची!त्यांच्या या सततच्या उल्लेखामुळे 130 करोड भारतीयांकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाच्या तोंडी हे शब्द आल्याशिवाय रहात नाहीत. मग भले ते चेष्टेच्या रूपात आले तरी ते सतत कानावर पडल्यामुळे त्याचा प्रतिसाद थोरांपासून पोरांपर्यंत सर्व थरातून मिळत आहे.
कोणत्याही सादाची पुनरावृत्ती झाली की त्याचा अनेक वेळा पुनरुच्चार होतो आणि मग ती गोष्ट डोक्यात पक्की बसते आणि मनावर कायमची ठसते. एखादी गोष्ट मनावर बिंबवल्या शिवाय त्याचा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार एखादी साद घातली गेली की त्याचा प्रतिसाद आपोआप मिळत जातो. अशी वाक्ये जनमानसाच्या अंतर्मनावर कायमची कोरली जातात, आणि त्याची ' ब्रीदवाक्य' होतात.
तुम्हाला असे वाटेल की अशा मोठ्या लोकांनी बोललेल्या जड शब्दांनाच प्रतिसाद मिळतो की काय ?पण तसे नसते .अगदी साधं उदाहरण म्हणजे लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना संस्कार वर्गात घालण्याची जरूर नसते. आपल्या स्वतःच्या वागण्यातून आणि त्यांना एखादी गोष्ट सतत सांगून त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून करवून घेऊ शकतो. पूर्वी घरातील मोठी माणसं मुलांकडून परवचा म्हणून घ्यायची. त्यांच्या या नित्यनेमामुळे मुलांचे श्लोक व पाढे सहजरित्या पाठ व्हायचे.  बाहेरून घरी आले की पाय धुणे, काम झाल्यावर वस्तू आवरून ठेवणे, यासारख्या गोष्टी मुलं अनुकरणाने शिकतात. त्यामुळे आपल्या क्रियेतून घातलेली ही एक प्रकारची सादच म्हणावी लागेल ना? जी रोज केल्यामुळे त्याला छान प्रतिसादही मिळतो .
अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ज्या प्रतिक्रिया,प्रतिसादात रूपांतरित होतात. जसे की, केव्हाही, कुठेही राष्ट्रगीत ऐकू आले की आपण आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहतोच, मग ही प्रतिक्रिया समजायची की प्रतिसाद ?असा मलाच प्रश्न पडतो.पण खरंच अर्थाअर्थी दोन्ही शब्द सारखे वाटले तरी त्यातील सूक्ष्मता कळण्यासाठी आपण तेवढेच जागरूक असणे खूप जरुरी आहे.
प्रतिक्रिया ही ठराविक लोकांकडूनच मिळते, तर प्रतिसाद हा समाजातील सर्वांकडून किंबहुना सर्व समाजाकडून अपेक्षित असतो. त्यामुळेच कदाचित समानार्थी असले तरी दोन्ही शब्दांचे संदर्भ वेगळे असतात तर असा हा प्रतिसाद/ प्रतिक्रियेतील सूक्ष्म फरक शोधताना खरंच खूप मजा येते. तर मग तुम्ही पण एकदा   Try करून पहाल का? नाही...  मी तर म्हणते  पहाच.
Skismita@gmail.com
Mobile no. 9922112732
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
                साद प्रतिसाद
लेखिका-सौ.शुभांगी लेले
        "रे मना आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली,ही किमया भोवताली"
       हे गीत ऐकताना जाणवतं माणसाला डोळे आहेत,तरी बघण्याची द्रुष्टी हवी.
पूर्ण चंद्र बघितला कीं, सागराला उधाण येतं.उन्हात पाऊस पडला कीं,इंद्रधनुष्य दिसतं,डोंगर हिरवेगार दिसू लागतात.एकंदरच निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टी सादाला दिलेला प्रतिसाद आहे.
         अलिकडेच कोरोना संदर्भात मा.नरेंद्र मोदीनी 10मि.लाईट घालवायला सांगून मेणबत्ती लावायला सांगितले,घंटानाद करायला सांगितला,मास्क बांधल्याशिवाय बाहेर पडू नका वगैरे गोष्टीसाठी भारतीयांना साद घातली आणि उत्तम असा प्रतिसाद त्याना मिळाला.करोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही ,म्हणून त्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टीना आपल्याला प्रतिसाद द्यायला हवा.
    अंध मुलांकडून शिकावं.....कसा प्रतिसाद द्यायचा असतो ते!आमच्या गंगामाईत 'य़ल्लव्वा' नावाची अंध गायन  शिक्षिका आहे.विशारद आहे.मुलांना सुंदर शिकवते.तिला काहीही नवीन सांगायचे असले कीं,मला आवर्जून सांगते. मी तिला, 'तुला नक्की जमेल ,कर'.म्हंटलं की त्यासाठी खूप झटते आणि करुन दाखवते.गाण्याना चाली लावते,गीत रचते.तिचा मिळणारा प्रतिसाद बघून आपण धडधाकट असून कांहीच केलं नाही,याची जाणीव होते.
   देशासाठी लढणाऱ्या , जवानांना सलाम करावासा वाटतो.देशरक्षणासाठी घातलेल्या सादाला दिलेला प्रतिसाद अमुल्य आहे.
       अरे ला, का रे प्रतिसाद देणं सोपं आहे.पण अरे ला शांतपणे ऐकून घेऊन नंतर शांतपणे योग्य प्रतिसाद देणं अवघड आहे.
      सर्व मैत्रिणींचे लेख वाचून लिहिलेला हा लेख माझा प्रतिसाद आहे.
धन्यवाद.
       Shubhangi lele sl @.com.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
           साद प्रतिसाद 
     लेखिका-सौ ज्योती विलास जोशी       
      बाबविषय खूपच व्यापक आणि लिहायला तितकाच सकारात्मक आणि आव्हानात्मक! मनाला साद घालणारा आणि प्रतिसादाची अपेक्षा करणारा असा!
          'साद-प्रतिसाद'या शब्दद्वयीचा विचार करताना त्याला समांतर किंबहुना त्यांच्या थोड्याशा जवळपास जाणारा असा क्रिया-प्रतिक्रिया हा जोडशब्द असू शकतो, असे वाटले पण फरक आहे.
          साद जितकी आर्त, तितकाच प्रतिसाद व्याकुळ असतो पण तितकाच तो सकारात्मक ही असतो. याउलट, क्रियेला दिलेली प्रतिक्रिया ही नकारात्मक असू शकते.
          सादप्रतिसाद यांमध्ये एका हेअर लाईन इतके अंतर असते असे मला वाटते. म्हणजेच दोघांमध्ये एक पुसटशीच रेघ आहे. आणि ही हेअर लाईन किंवा पुसटशी रेघ साद आणि प्रतिसाद या दोन्हींची इन्टेन्सिटी समान झाली  की पुसून जाते. दोन प्रेमी युगुल एकमेकांना साद देतात आणि एकमेकांकडून प्रतिसादाची वाट पाहतात. जेव्हा दोघांमधील अंतर कमी होते तेव्हा प्रेमाचा पाट वाहू लागतो आणि हेअर लाईन गायब  होते.
       विजापूरच्या गोल घुमटात आपण दिलेला साद  हा प्रतिध्वनीच्या स्वरूपात आपल्याला प्रतिसाद देतो. ह्याच साद प्रतिसादाचा अनुभव घेण्यासाठी आपण गोल घुमट ला भेट देतो.
          महाबळेश्वरचा echopoint ही साद प्रतिसादाचा आनंद देतो.
           टप्प्याचा चेंडू खेळताना देखील टप्पा पडलेला चेंडू पुन्हा हाताला लागावा यासाठी  केलेला प्रयत्न म्हणजे  साद प्रतिसादाचे उदाहरण.
                 प्रतिक्षिप्त क्रिया ही सुध्दा साद प्रतिसादाच्या जवळपास जाणारी अशी आहे. आपल्या मनाला साद दिली की ते प्रतिसाद देते व आपल्या हातून कृती घडते.
           म्हणजेच प्रतिसाद ही साद ह्या क्रियेवर ची प्रतिक्रिया असते असं म्हणायला हरकत नाही.
          मूल जन्माला येत आणि साद प्रतिसादे चा प्रत्यय यायला लागतो. मातेचा स्पर्श होताच बाळ  हुंदका आवरते. अजून नजर न स्थिरावलेला बाळ, आईने साद दिली की नजरेला नजर न भिडवता स्मितहास्य करतो. केवढी ती प्रेमळ साद आणि केवढा तो सुंदर प्रतिसाद!
           सकाळच्या कोवळ्या उन्हात अंगणात बसलेले बाळ, मुठीमुठी भरून जोंधळे उडवते, तेंव्हा चिऊ- काऊची पलटण त्याच्याभोवती, त्याच्या बॉडीगार्ड सारखी  गोळा होते.साद प्रतिसादाचे हे बोलके उदाहरण.
              दिव्यांग मुलांचा हात ब्रेल लिपी वर फिरतो आणि ती लिपी त्यांना साद देते आणि प्रतिसाद म्हणून  शब्द कागदावर उमटतात.हा स्पर्शाचा साद प्रतिसाद.
        कोशिश सिनेमात मूक बधिर जोडप्याला झालेले बाळ, तसेच अपंग नसावे ही आई वडिलांची इच्छा रास्तच आहे . मुलाची s श्रवणेंद्रिये तपासण्यासाठी जोडप्याने केलेला घंटानाद आणि तो आटापिटा अंगावर शहारा आणतो. काय तो साद आणि काय तो प्रतिसाद! 
       वंदेमातरम ऐकू येताच आपण तटस्थ उभे राहतो ही देशभक्तीच्या सादेला आपण नतमस्तक होऊन दिलेला प्रतिसाद आहे
           एखाद्याची मनस्थिती समजून, त्याच्या भावना आपल्या पर्यन्त पोचल्या हे पोहोचविणारया भावनेला  सुध्दा प्रतिसादच म्हणतात.
                --प्रतिसाद न देणे, हा सुद्धा एक प्रतिसादच .मूक प्रतिसाद म्हणा हवं तर! अशा वेळी आपण घातलेली साद ही अपुरी आहे ह्याची जाणीव व्हायला हवी.
           अमीर खान, नाना पाटेकर ,मकरंद अनासपुरे यांनी जलाशिवार योजनेसाठी आपल्याला साद घातली आहे.'पाणी वाचवा, पाणी साठवा' असे हे अभियान आपल्याला साद घालते आहे. आपला प्रतिसाद अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर व्हा अशी साद दिली आहे. 'मेक इन इंडिया' या अभियानावर भर दिला आहे. त्याला,आपला 'एक भारतीय नागरिक' म्हणून प्रतिसाद आवश्यकआहे. कारण सादेला दिलेला प्रतिसाद जितका मोठा तितका देशाचा विकास मोठा. कारण विकासाला प्रतिसादाची शिडी लागते. तसेच साद जितका वजनदार तितका प्रतिसाद व्यापक.
       इचलकरंजी कृतीगट वाचन कट्टा या ग्रुप वरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. अर्थातच प्रतिसादाची अपेक्षा करते. कारण व.पू.काळे नी म्हटले आहे प्रतिसाद देणारे मन हे साद देणाऱ्या मना इतकेच मोठे असते😄
jvilasjoshi@yahoo.co.in
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
                 साद प्रतिसाद
लेखिका - सौ. दीपा नारायण  पुजारी,
       आज आजोबांना थोडे बरे वाटत नव्हतं. सकाळपासून ते पडूनच होते. अंगही दुखत असावं.'आई गssss आssई आई गं'. तिथंच खेळत असलेल्या  पाच वर्षाच्या रेवाने विचारले "आज्योब्बा तुम्ची आई कुठे आहे? इत्कं बोलावताय तुमी तली येत का नाहीय ती?" आपली आई लगेच येते मग आजोबांची का बरं  येत नाही? असे त्या बालमनाला वाटलं  असावं                    छोटा गोटू आई बाबांच्या बरोबर नाईकबाला गेला होता. काही केल्या तो जयबाप्पा करेना. शेवटी आई थोडी दटावून म्हणाली, "गोटू,नमस्कार कर बाप्पाला." गोटूच्या चेहर्‍यावर भलं  मोठं  प्रश्नचिन्ह होते. "पण आई ,बाप्पा कुठं आहे?" खरंच सगळ्या देवळात असते तशी देवाची मूर्ती इथं  नव्हती. देवळातले पुजारी हसले व त्यांनी समोरच मांडून ठेवलेली फुलांची आरास बाजूला करून नाईकबा दाखवले. आता गोटूचा निरागस चेहरा खुलला.हात जोडून म्हणतो कसा "बाप्पा लपून बसलाय". पण त्याच्या उत्सुकतेमुळं सगळ्या गाभार्‍यात असलेल्या भक्तांना नाईकबाचे दर्शन झालं .
          पुष्कर ९-१० महिन्यांचा असेल त्याच्या बाबांनी नविन कार घेतली होती... लाल मारुती. आजोबांच्या कडेवर बसून तो पूजा बघत होता. आता तो लाल रंगांच्या पळणार्‍या वस्तूंनाच फक्त कार म्हणतो. लाल कार दिसली की तो बोट दाखवून 'काssss 'म्हणतो. इतर रंगांच्या गाड्या त्याच्या लेखी कार नाहीत!!
रोज रात्री ९ वाजता आजीचा फोन वाजला की दीड वर्षांचा राधू "आsssत्या! आsssत्या!" म्हणत पळत पळत फोन कडे येतो. एव्हढासा चिमुकला ओळखतो बरं का ;आई चा फोन वाजला की माछि बोलते आणि  आजीचा वाजला की आत्त्या!!
असे अनेक साद आणि  त्यांना मिळणारे प्रतिसाद! मानवी जीवनाचा अविभाज्य अंग! संवेदनशील असण्याचं लक्षण!
कधी एखाद्या चित्राला मिळणारी पावती!
तर कधी सुगरणी च्या पदार्थांची पोटभर स्तुती !
       कधी सुरेल गाण्याला मिळणारी दाद!
   तर कधी वा!क्या बात है ! असा शेरोशायरी प्रतिसाद .गोठ्यात वासराने हंबरून आईला घातलेली साद,तर आईने वासराचे अंग चाटून दिलेला प्रेमळ प्रतिसाद .
    पाणी घातल्यावर अबोलीच्या बियांचा ऊडी मारून मातीत रुजण्याचा प्रयास
    त्यावेळचा तडतड आवाज.कोवळ्या
उगवतीच्या रविकिरणांनी हळुवार हात
फिरवून जागे केल्यावर पक्षांनी केलेला मंजुळ किलबिलाट ,
   तर संध्याकाळी त्याच केशरी रवीरथाचा निरोप घेताना झालेला गलबलाट .
  पहिल्या जलधारांना मातीत सामावून घेत धरणी मातेने सोडलेला तृप्त श्वास म्हणजे मृदगंधाच्या  रुपातला त्या सरींना दिलेला एहसास!" अशी किती उदाहरणे द्यावीत?
संवेदनशीलता, चेतनाक्षमता ही सजीवांची लक्षणे आहेत. समोर सुंदर काव्य वाचन चाललय पण वा वा ची दाद येत नसेल तर कविता रुसते!कवी हिरमुसतो.एखादा वक्ता विनोदी फार्सिकल बोलून एखादी विसंगती व्यक्त करतो तेंव्हा सभागृह हास्यरसात बुडुन जाते.
           साद प्रतिसाद ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. Reflex action. प्रतिसाद जर ऊत्स्फूर्त असेल, कौतुकाची थाप देणारा असेल तर साद अधिकच आवेगाने येते. साद प्रतिसादाची ही देवाणघेवाण आनंददायक होत जाते.मानवी मन अधिक प्रगल्भ होते. आयुष्य सहज सुंदर बनते. मुले जाणती, धीट, सक्षम बनतात. घरातील वातावरण आनंदी राहते. नात्यांची वीण घट्ट होत जाते. पण हाच प्रतिसाद राग, मत्सर, कीव अशा स्वरुपाचा असेल तर साद ओठातच विरते. जगणे अवघड होते. मुले भित्री होतात. व्यक्त व्हायला घाबरतात. संभ्रम वाढत जातो. खेळीमेळीचे वातावरण नष्ट होते. घरातील भांड्यांमधून बदसूर ऊमटू लागतात. नात्यांची वीण उसवते.
प्रत्येक घर मुलांच्या रुपात समाजालाही सुजाण नागरीक देत असतं . या लहानग्यांच्या वाढीत कुटुंबाची जबाबदारी मोठी असते. मुलांना मिळणारं  प्रेम, माया, आदर व संस्कार यांच्या शिदोरीवर ते मूल वाटचाल करत असतं . त्यामुळे आई वडिलांनी व घरातील इतर सदस्यांनी मुलांना योग्य प्रतिसाद देणं  गरजेचे आहे. इथं एक ऊदाहरण द्यावंस वाटतंय . लहानपणी आमच्या शेजारच्या घरातील हे नाट्य . . . . . .
पेपर देऊन मुलं घरात आल्यावर त्यांचे स्वागत करायला आई दारातच छडी घेऊन बसलेली असे. पेपरमधील चुकांचा दारातच शहानिशा केला जाई. छड्यांचा प्रसाद ही मिळे. ते मूल घाबरून कोमेजून जाई. भितीने दुसर्‍या दिवशीचा पेपर ही अवघड जाई. त्यापेक्षा त्याला मायेने घरात घेऊन, खाऊ पिऊ घालून थोडी विश्रांती घेऊ द्यावी. थोड्या वेळाने अभ्यासाला बसवावं. नंतर सावकाशपणानं झालेल्या चुका टाळण्याकरता सूचना द्याव्यात, तर ते मूल दुसरा पेपर चांगल्या पद्घतीनं लिहू शकेल. त्याचा पालकांवरचा विश्वास वाढेल. पालकांचं  व त्याचं  नातं  जास्त घट्ट होईल.
एडिसनच्या आईनं  हे जाणलं  होतं, म्हणूनच बल्बचा शोध लागला. जगाला एक संशोधक मिळाला व संशोधनाची नवी कवाडं  उघडली गेली. सकारात्मक वातावरणात वाढलेली मूलच समाजासाठी विधायक,भरीव काम करू शकतील, बरोबर ना?
          मो. नं.  -- 9665669148
Email - deepapujari57@gmail.com

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

No comments:

Post a Comment