Tuesday, June 23, 2020

नातं- भाग ३

🔸नातं - गोपाळा.🔸
लेखन- गणेश शिंदे.

   नाती कुठे, कधी , कशी तयार होतात, हे सांगता येत नाहीत. सख्खी नाती भरपूर असतानाही जोडलेली नाती निर्माण होतात आणि ती जवळची कधी होतात कळतंच नाही.या वाचन कट्ट्यावर अनेकांचे अनेक लेख वाचले अन् भावलेदेखील. यातूनच माझ्या आयुष्यातील एक नातं उलगडण्याचा हा प्रयत्न....

आपल्याच(इचलकरंजी) गावात असलेल्या एका नामवंत डॉक्टरांच्या घरी त्यांच्या वडिलांना सोबत  म्हणून मी जात होतो... इथेच एका नवीन नात्यात बांधलो गेलो.... तर झाले असे की, मी माझ्या काकांच्या म्हणजे गद्रे काकांच्या घरी अभ्यासाला जात असे... एकदा काका - काकूंच्या बोलण्यात विषय आला की...त्या डॉक्टरांकडे पाठवलेला तो मुलगा न सांगताच सोडून गेला. त्यांनी परत कोण येईल का? असे विचारले आहे.  काकांनी मला सहजच विचारले  ..तू जातोस काय?...  पण सुरुवातच  'नाही' पासून करायला नको आणि दुसरं म्हणजे काकांच्या पुढच्या अनेक प्रश्नांना सामोरे जाण्यापेक्षा होय म्हटलेलं बरे...😊😊 म्हणून मी जातो म्हणालो...आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. घर एवढं मोठं आणि तेही इतकं स्वच्छही होतं.. घरात इतकी शांतता, इतका व्यवस्थितपणा, वस्तूंची सुंदर मांडामांड...सगळं कसं चित्रपटात असल्यासारखं वाटतं होतं. घरी काकू होत्या. त्यांनी बसायला सांगितलं आणि पाणी दिलं. सुरुवातीला वाटलं, आपण काही इथे राहू शकणार नाही . गद्रे काकांना बहुतेक दुसऱ्या कोणालातरी पाठवावे लागणार... पण नंतर काका-काकूंच्या व माझ्या गप्पा सुरु झाल्या... ओळख झाली. मला तिथे काय काम करायचे आहे हे काकूंनी सांगितले. वेळ ठरली आणि नंतर आम्ही आजोबांच्या... म्हणजेच बापूंच्या खोलीत गेलो....९४-९५वर्षांचे बापू, अंगाने बारीक, रंगाने गोरे, पातळ सुती सदरा घालून, अर्धवट डोळे मिटून झोपले होते. आमची ओळख झाली, मी माझं नाव त्यांना सांगितलं "गणेश". काकू म्हणाल्या, "बापू ,उद्यापासून हा रोज रात्री येईल तुम्हाला सोबत म्हणून, रात्री काही लागलं तर याला हाक मारा,तो देईल".
     
दुसऱ्या दिवशी रात्री १० च्या दरम्यान मी गेलो. सर्वांशी ५-१० मिनिटे बोलून मी बापूंच्या खोलीत गेलो. नंतर बापूंना काकूंनी दूध आणि गोळ्या दिल्या, मी आणि बापू थोडं बोललो आणि झोपायची तयारी केली. खूप अवघड्यासारखं वाटतं होतं. बापू झोपले...मला मात्र झोप येत नव्हती. एकच विचार यायचा, रात्री बापूंनी काही मागितलं आणि मी उठलोच नाही तर म्हणून रात्रभर जागाच राहिलो . सकाळी बापूंना प्राथमिक मदत केल्यावर  बापू आणि मी चहा  घेतला आणि थोड्या वेळाने बाहेर पडलो. सुरुवातीला मी गेल्यानंतर रोज बापूंना माझं नाव सांगत असे. पण त्यांना माझं नाव लक्षात राहायचं नाही. ते गोपाळा म्हणायचे आणि कायम मग गोपाळाच म्हणत राहिले. रात्री मी गेल्यावर माई झोपायला जायच्या. मी बापूंना दूध गोळ्या देऊन आम्ही खूप गप्पा मारत असत. कधी कधी मला उशीर व्हायचा त्यावेळी  काकू दूध घेऊन जायच्या तर बापू काकूंना म्हणायचे "गोपाळा येणार आहे ना? तो आल्यावरच घेईन".आज हे आठवलं की डोळे लगेच पाणावतात. त्यांच्या आयुष्यातील खूप आठवणी, प्रसंग, नोकरीत असतानाचे किस्से, अडचणी, दुःखे... त्यांचा दिनक्रम ..अशा बऱ्याच गप्पा होत असत. अजूनही बापूना इतकं आठवत होतं याचं आश्चर्य वाटायचं.आणि माझ्या मनात यायचं.... बापूंना इतकं सगळं आठवतं मग माझं नाव का लक्षात रहात नसे बरं? ....गप्पा वाढल्या की काका-काकू येऊन डोकवायचे मग आम्ही शहाण्या मुलानं सारखे झोपायचो.
     
काही महिन्यानंतर चांगले फिरणारे, गप्पा मारणारे बापू जास्तच आजारी पडले. अंथरुणाला खिळले ..  खाणं- पिणं,औषधे पाईप मधून द्यावी लागायला लागत होती. बापूंना बहुतेक त्रास व्हायचा. त्यांची तळमळ खूप व्हायची.  बोलत नव्हते, सारखे हात जोडायचे. त्यांची ही अवस्था बघून सर्वांना वाईट वाटायचं. काका-काकू खूपच काळजीने  बापूंना सांभाळायचे. या काळात काकांचे भाऊ,वहिनी,(काका- काकू), बहिणी(आत्या) या सर्वांचीही ओळख झाली. सर्वजण बापूंसोबत राहायचे.  रोज रात्री दूध देणं, मग गोळ्या, रात्री तहान लागल्यावर उठून पाणी देणं, सकाळी ब्रश पुन्हा चहा,अंग पुसणे, कपडे बदलणे, यामध्ये वर्ष कधी संपले कळलेच नाही. बापूंशी एक खूप छान नातं बांधलं गेलं. हे नातं असं होतं की आजही मला या नात्याला काय नाव द्यावं हेच कळलं नाही. याच काळात काकूंशीही एक छान नातं जमलं. काकूंना कलेची खूप आवड. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ती पहावयास मिळायची.  यातूनच आमचं जे ट्युनिंग जमलं त्यामुळेच मला प्रत्येक गोष्टीत, प्रसंगात सजावट करता येऊ लागली. पुढे नोव्हेंबर मध्ये माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी मी दोन-तीन दिवस सुट्टी घेतली. भावाचे लग्न ज्या दिवशी होते त्या दिवशीच बापू गेले. माझ्या घरी लग्न म्हणून मला काही सांगितले नव्हते. दुसऱ्या दिवशी मला कळलं की बापू गेले. विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर.  बापू, त्यांचं बोलणं, त्यांच्या हालचाली सगळं आठवू लागलं. डोळ्यातलं  वाहणारं पाणी थांबतच नव्हतं. माझ्या आईला त्यांच्या प्रत्येक आठवणी सांगून रडत होतो.काहीतरी माझ्यापासून लांब गेलंय असे वाटत होतं....का मी सुट्टी घेतली असही वाटायचं..
   
आज या गोष्टीला ९-१० वर्षे झालीत.... पण आजही बापू म्हटलं की त्यांची हालचाल  ,बोलणं, त्या सर्व गोष्टी आठवतात आणि नकळत डोळे पाणावतात. त्या वेळी काकांनी मला बापू गेल्याचे सांगितले असते तर आज  मला जे बापू आठवतात ते कदाचीत आठवलेही नसते. यानंतर बऱ्याचदा कोणीतरी ,काही कामासाठी  विचारतात की नाव काय तुमचं. मी सांगतो, गणेश, गणेश शिंदे. पण मनात कुठंतरी ..."गोपाळा, गोपाळा"...ऐकू येत असतं..... 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸ये जो खिडकी है🔸 
लेखन- चित्कला कुलकर्णी

आठशे खिडक्या नऊशे दारं... रेडिओवर गाणं लागलं होतं. गाणं ऐकता ऐकता खिडकीशी संबंधित आणखी काही गाणी आठवली. 'मेरे सामनेवाली खिडकी मे.... शाम ढले खिडकीतले...
ये जो  खिडकी है...आणि मग कविताही  आठवत गेल्या. एका कवितेत इंदिरा संत म्हणतात, 'घराला एक खिडकी हवी..'

कविता आठवता आठवता डोक्‍यात लख्खकन् वीज चमकून गेली .....
अरे ! माणसाचं आणि खिडकीशी असलेलं नातं किती सुरेख आहे! आता हेच बघा, माणूस प्रवासाला निघाला की त्याला खिडकीची जागा हवी. आरक्षण करायचं असेल तर तो आधी खिडकीच्या जागेची चौकशी करतो. आरक्षण मिळालं नाही तर गाडी लागताना धावत धावत जाऊन खिडकीतून आपलं सामान टाकून ती जागा पटकावतो आणि मग जग जिंकल्याचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. परवा तर गंमतच पहायला मिळाली. बसला  प्रचंड गर्दी एक बाई आपल्या  लहानग्याला घेऊन निघाली होती. बिचारीला चढताच येईना. मग , खिडकीची जागा कुठली ?  शेवटी तिनं शक्कल लढवली. लहानग्याची ओली झालेली चड्डी खिडकीतून आत टाकली. आणि म्हणाली, " अहो, काय करायचं? माझ्या बाळाला खिडकी खूप आवडते. घरातही खिडकीजवळ गेलं की गप्प बसतो बघा.. आता ही  खिडकीची जागा मिळेल बघा.. दुसरं कोण बसणार त्या ओल्या जागेवर ...?  पोरगं खूश आणि मीही ... " 
गंमत आहे ना ?
 
प्रवासात प्रत्येकालाच खिडकीजवळची जागा हवी असते. स्वच्छ मोकळा वारा अनुभवायचा असतो. पाठीमागे धावणारा निसर्ग, गावं, शहर सारं सारं न्याहाळायचं असतं. गाडी थांबली की बाहेरची गंमत बघायची असते. विक्रेत्यांकडून काही घ्यायचं द्यायचं असतं. आणि हो, कुणाकुणाला अविचारानं काही फेकायचंही असतं. खिडकीतून बाहेर हात काढून नये, डोकावू नये अशा सुचना असल्या तरी  बाहेर हात काढायचा असतो.डोकावायचं असतं. खिडकी उघडत नसली की प्रवाशाला चैन पडत नाही. धडपड धडपड करून तो ती उघडतोच.   कधी कधी तर संकटकाळी बाहेर पडायचा मार्ग असे लिहिलेल्या खिडकीचा उपयोग आत येण्यासाठी तो करतो. गंमत आहे ना ! 

सरकारी खासगी कार्यालयांच्या खिडक्यांचं नातं आदरयुक्त धाकाचं. विद्यार्थ्यांना विद्यापिठाशी संबंधित कुठलीही माहिती किंवा कागदपत्रे मिळावीत म्हणून एक खिडकी योजना सुरू केली. तसंच सरकारी कार्यालयात कार्यान्वित केलेल्या एक खिडकी कक्षामुळे विविध परवानगी मिळवणं प्रचार करणं सोयीचं झालं. संगणकात तर शोध खिडकीला( सर्चविंडो) अतिशय महत्त्व. या कामाच्या खिडक्या बंद असल्या सगळंच ठप्प!!
 घराला तर  खिडक्या हव्यातच. पूर्वी वाड्यांना ऐसपैस खडिक्या असायच्या. (आता फक्त त्यांची वर्णनं चित्रं ऐकायला, पाहायला मिळतात. पण, आपण भाग्यवान आहोत. आपल्या गावात अजून काही वाडे आणि त्यात आपल्याला बसता येतील एवढ्या मोठ्या खिडक्या आहेत.) आता वाडे  संपत आले. खिडक्यांचं रूप बदललं. परवाचीच एक घटना..
 एके ठिकाणी घराचं बांधकाम सुरू होतं. घर मालक कामगारांना खिडक्या बाबत सुचना देत होता. सरकती, आतून उघडणारी,  बाहेरून उघडणारी ...अशा खिडक्या कुठे कुठे असाव्यात हे समजावून सांगत होता. सरतेशेवटी एक वैशिष्ट्यपूर्ण खिडकी त्यांना बनवायला सांगितली. एका मोठ्या चौकटीत पुन्हा एक मोठी जाळी असलेली पूर्ण उघडणारी चौकट करायला सांगितली. त्या खिडकीतून पूर्णपणे बाहेर डोकावून पाहता यावं,  मोठं सामान बाहेर सोडता यावं अशी रचना करायला सांगितली. जेव्हा ती खिडकी पूर्ण झाली तेव्हा कामगारांनाही त्या खिडकी बाहेर डोकावून इतरांशी गप्पा मारून आनंद घेतला. खरंच, माणसाला खिडकी अतिशय प्रिय. माणसाच्या मनाला देखील अशीच खिडकी असावी. बाहेरचं  विशाल जग  त्यातून पहाता यावं. दुर्विचार शिरू नयेत म्हणून खिडकी बंद ही करता यावी.  निसर्गाचं मनोहारी विभ्रम पाहण्यासाठी स्वच्छ, निरभ्र, आकाशाचा आनंद घेण्यासाठी जगात चालणारी सुखदुःखं जाणून घेण्यासाठी त्याला ती खिडकी उघडता यावी. हो नं ?
     
chitkala.kulkarni20@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात्यांचा गमतीदार संबंध🔸
लेखन- स्वाती कुलकर्णी-जोशी

नातं रक्ताचं ,नातं मैत्रीचं ...कधी प्रेमाचं, कधी भक्तीचं ..नातं निसर्गाशी जोडलेले .. नातं  मुक्या प्राण्याशी जोडलेलं.. विविध अंगांनी फुलणारं... मना मनाशी एकरूप होणारं..
 माणूस कितीही एकटा राहतो म्हणाला... तरी मानवी मनास कोणाच्या ना कोणाच्या  नात्याचा आपलेपणा हवाच असतो. इथकेच काय,  प्रत्येक सजीव घटकाला आपलेपणा हवा असतो ...म्हणून तर कीडा-मुंगी पासून ...प्रत्येक जण गटात रहात  असतो.
माणसाचं सुद्धा असंच आहे बरं का... !! नात्याशिवाय तो कदापीही राहू शकत नाही.
        
काही माणसं नाती प्राणपणानं जपणारी असतात ...पण काहीजण *बादरायण*संबंध* जोडून घेणारी असतात.. एरवी या नात्यांचा फारसा संबंध नसणारी सुद्धा ...विशेष काही घडले तर तो आमचंच  की... असे म्हणून रिकामी होतात --- माझ्या आजोबांचे एक मित्र होते. ते चारचौघात गप्पा मारायला लागले की हमखास एक वाक्य यायचंच.. ते ना ..ते आमचे स्नेहीच !!!! म्हणजे बघा...कोणीतरी म्हणायचं "अण्णासाहेब, काल ते रावसाहेब भेटले बघा, काय दिलदार माणूस हो.. पन्नास एकराचा मालक आहे पण गर्व म्हणून तो  नाही. मी सहज घरी गेलो तर एवढा पाहुणचार केला की काही विचारू नका." यावर हे आजोबांचे मित्र लगेच म्हणणार,"ते रावसाहेब होय, अहो, मी ओळखतो त्यांना... ते ना ..ते आमचे स्नेहीच!!. मागच्याच्या मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे , आम्हाला तर चार दिवस ठेवून घेतले होते....आमचे अगदी खासच हो ते "  यावरती माझा मामा म्हणायचा, -- उद्या चंद्रावरनं जरी कुणी आलं ना तरी तो यांचा स्नेहीच..हे ऐकून आम्ही भाचे कंपनी खो खो हसायचो. असते काहींना आत्मप्रौढी दाखवायची सवय... काय करणार?

अगदी अशीच माझ्या आईची मैत्रीण होती. कोल्हापूरला राहायची .. माझी आई शिक्षिका असल्यामुळे दोघी सारख्या कामानिमित्त एकत्र यायच्या... कधी आमच्या घरी, तर कधी तिच्या घरी ...तिला आजूबाजूला घडलेल्या मोठ्या घटनांमध्ये आपल्या संबंधित कोणी आहे हे सांगायला फार आवडायचे..

एकदा ताराराणी विद्यापिठात अभिनेत्री सुलोचनाबाई भेट देण्यास आल्या. कार्यक्रम चालू असतानाच ही माझी मावशी आईला म्हणाली, "सुलोचनाबाईंची भाची आहे ना, ती माझ्या वहिनीची खास मैत्रीण आहे बरं का !!अगदी गळ्यात गळे!!" ...बरं वहिनीचं आणि हिचं पटतंय का.. तेही नाही हो... तरीही हिचं "माझ्या वहिनीची....." हे पुन्हा कुठूनही कसेही नाते जोडण्याचा प्रपंच आहेच ..
           
काही जणांना आपल्या जवळच्या नात्यांविषयी  जरा जास्तच कौतुक असतं( सर्वांनाच असते पण त्याचे प्रदर्शन  करणारे हे लोक).. म्हणजे आपला तो बाब्या ...या कॅटेगरीमध्ये.." आमची सानू आहे ना .. तीअजिबात आंबट खात नाही हो...!! काय स्वयंपाक करायचा कळतच नाही हो" ..अरे , सगळा स्वयंपाक आंबटच असतो का?
         
आणखीन एक आसामी...यांच्या संपर्कात अनेक दिग्गज लोक आले होते.(की हे अनेक दिग्गज लोकांच्या संपर्कात आले होते...!) अश्या व्यक्ती स्वयंप्रकाशी आणि स्वकर्तुत्वावान असतात .. म्हणजे मोठे राजकारणी, सिनेकलावन्त, थोर साहित्यिक,महान समाजसेवक, महान कलाकार ,खेळाडू.. यांच्या  संपर्कात आले होते. तुम्ही कधीही आमच्या या महोदयांना भेटा, हे नक्की तुम्हाला चार पाच अश्या लोकांच्या भेटी सांगतील....आणि अशा सांगतील की हे  दोघे जणू परममित्रच..खरं तर  याभेटींचा उल्लेख नेहेमी नम्रतेने व्हायला हवा...ते मोठे आहेत यात आपला "ग्रेट"पणा तो काय?..
           
हल्ली सेल्फी काढण्याचा धडाका इतका मोठा आहे की प्रमुख पाहुण्यांना या  सेल्फीने  धडकी भरते..त्यानंतर हे सेल्फी बहाद्दर ....ते आमच्या ओळखीचे आहेत असे सांगत सुटतात, "तेव्हां नाही का , आम्ही सेल्फी काढला होता त्यांच्याबरोबर...".असं हे दुसऱ्याच्या प्रकाशाने स्वतःला चमकविणारे बेगडी नाते..
              
एकदा अशी मोठी ओळख सांगणाऱ्या महाशयांना मी म्हणाले , "तुमची ओळख आहेच त्यांच्याशी तर एव्हढे माझ्या विद्यार्थिनींचे एक काम आहे ते करून द्याल का?आपण त्यांना भेटायला जाऊ या का?" तर म्हणाले, "गेलो असतो हो... पण फार बिझी असतात ना... असा "U"टर्न मारला की काही विचारू नका...हां !  पण या सगळ्यांमध्ये अनेक जण असेही भेटले..ज्यांना नात्यांचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला आहे.. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकासाठी यांच्या माणुसकीचा हात सदैव पुढे असतो..  खऱ्या नात्यांचा अर्थ इथे उमगतो..अश्या अनेकांपैकीं एक मैत्रीण मोठ्या शहरात राहते .गृहिणी पद सांभाळता सांभाळता अनेक लहान मोठ्या लोकांना सतत मदत करत असते. एकदा एका अतिशय प्रतिथयश  कवीचे शेवटचे काही दिवस तिने खूप सुसह्य केले, कधी गप्पा मारून , कधी हवे ते खायला घालून , कधी शुश्रूषा करत...पण तिने याची वाच्यताही कधी केली नाही. 
         
असे लोक पाहिले की नात्यांचा खरा अर्थ याना उमगला आहे असे वाटते मग ते नाते रक्ताचे असो वा आणखीन कोणतेही असो....!!
 
sjkmam@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸चिकणी सुपारी🔸
डॉ.अनुराधा कुलकर्णी

परवा ओटीच्या आलेल्या सामानातून तांदूळ बाजूला काढत होते. त्यात २रु चे नाण, खोबऱ्याचा तुकडा,हळकुंड आणि चिकणी सुपारी होती. चिकणी सुपारी हातात घेतली आणि मन सैरभैर झालं. डोळ्यासमोर 'आक्का'च आली.

आक्का म्हणजे माझी आजी! आईची आई, दिवाणबहाद्दूर गोडबोले यांची नात. ती चिकणी सुपारी खायची कातरून. भरडी सुपारी तिला लागायची व ती लवकर मऊपण होत नाही म्हणून चिकणी सुपारी. ४फूट६-७इंच उंचीची,वजन ३२-३५किलो असलेली होती माझी आक्का! आयुष्यभर सर्वांवर फक्त प्रेम आणि प्रेमच केलं तिने. कधी कोणावर रागावणं, चिडणं, द्वेष करणं तिच्या शब्दकोशातच नव्हतं.११वी पासून शिकायला मी तिच्याकडे होते. सर्व काम तिनेच शिकवले मला. रोज सकाळी साडेचार वाजता उठायची. वाड्यातील कुणाशी भांडण नको म्हणून। सर्वजण उठायच्या आत ती मला आवरायला लावायची. देवपूजा करून माझं आवारेपर्यंत घासण्यासाठी लगबगीनं उपकरणी तिसऱ्या मजल्यावरून खाली आणून द्यायची. कामं करून कोणीही मरत नाही असे म्हणायची. तेंव्हा इतका राग यायचा तिचा पण त्याचाच आता आयुष्यभर उपयोग होतोय आणि त्याचा अर्थही आता समजू लागलाय. आजारी असलेल्या आजोबांचं,अण्णांचं ७वर्षे अंथरुणावर तिने सर्व  केलं. प्रत्येकवेळी बेडपॅन स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून खाली यावं लागायचं तेव्हा. आंघोळीनंतर आक्काचा मेकअप आम्ही बघायचो. तिची लाकडी पेटी होती. त्यालाच आरसा होता. फणीनी वेणी घालायची. आधी मेण, मग त्यावर कुंकू.  चापून चोपून९वारी नेसायची. हौशी तर एवढी होती की आण्णा असेपर्यंत तिच्या डोक्यांतल फूल काही हालल नाही आणि मंगळवार, शुक्रवार जोगेश्वरी चुकली नाही.आमच्याकडे झोपाळा होता. बसायला येणाऱ्या मुलांसाठी खडीसाखर आणून ठेवी. तिचे उपास असायचे. त्यासाठी मीठ, साखर, दाण्याचं कूट वेगळे असायचे. मी तिला  म्हणायची,'वाणी तुझी साखर त्याच तराजूत तोलतो. त्यावर म्हणायची, दृष्टीआड सृष्टी!  फक्त २री शिकली होती, पण न चुकता वर्तमानपत्र वाचायची. दिवसभर नातवंडांना सांभाळायची,तेहीआनंदाने. म्हणी अगदी चपखलपणे वापरायची.पोत काम सुरेख करायची. तिला एकदा बरे नसताना दवाखान्यात नेऊन सर्व तपासण्या करून आणल्यावर तिला त्याचं एवढं अप्रूप वाटलं! लौकिकदृष्ट्या व्यवहार तिला कधी जमलाच नाही.'अजातशत्रू होती आक्का!  वयोमानानुसार थकत गेली आणि अण्णांना भेटायला निघून गेली. मला नेहमी म्हणायची, मी मेले की तुला माझी आठवण येईल. खरच बरोबरच होतं तिचं. 
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
     
🔸नातं गुरू शिष्याचे🔸
लेखन- सौ. वैजू फडके

'नातं' वाचनकट्ट्याचा आजचा हा विषय काही नवीन नाही. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. नाती अनेक प्रकारची असतात. आपण ती अनुभवत असतो. रक्ताची नाती,  मित्रमैत्रिणी बरोबर असलेली नाती, आपल्या सहवासात आलेल्या अनेकांशी असलेली वेगवेगळी नाती. अशी अनेक नाती आपण जपत असतो. यामध्ये गुरुशिष्याचे नातेदेखील असते. हे मी अनुभवले आहे. जवळजवळ वीस वर्षे क्लासेस घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांशी माझं नातं जोडलं गेलं. विद्यार्थी अगदी निर्व्याज प्रेम करत असतात. आयुष्यभरासाठी टिकणारी ही एक शिदोरीच असते.  त्यांच्याकडूनही आपल्याला खूप शिकता येते.       

सुरवातीला विरंगुळा म्हणून सुरू केलेले नंतर गरजेपोटी वाढवलेले क्लास हा माझा एक ठेवाच आहे. हे क्लास बंद करताना मला अतिशय त्रास झाला. माझे विद्यार्थीसुदधा त्यावेळी हळवे झाले होते. नाहीतर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ सहा ते सात तास मी त्यांच्यातच असायचे. विद्यार्थ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. त्यांनी माझ्या शिकवण्याचे चीज केले.
 
मला आजही तो दिवस आठवतो. वीसेक वर्ष झाली असतील. एक दिवस माझा क्लास चालू होता. आणि अचानक एक बाई व तिच्याबरोबर एक सहावी सातवीतील मुलगा माझ्याकडे आले. ती बाई त्याला शिकावणीसाठी घेऊन आली होती. अगदी केविलवाणा दिसत होता तो. अचानक माझ्याजवळ येऊन माझ्या पाया पडत तो म्हणाला,"बाई, मला तुमच्याकडे क्लासला यायचेच आहे." हे वाक्य मी अजूनही विसरले नाही. लवकरच माझ्या लक्षात आले की तो अतिशय बुद्धिमान व कष्टाळू आहे. हलाखीची परिस्थिती असूनही शिकण्याची जिद्द आहे. मी सुद्धा मग ठरवले की त्याला होईल तेवढे आपण शिकवायचे. आज तोच मुलगा म्हणजे निखिल, सी.ए. होऊन दिल्लीला मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पदावर आहे. मात्र अजूनही तो माझ्या संपर्कात आहे. छोट्या मोठ्या गोष्टी तो मला सांगतो, सल्ला विचारतो. मागील वर्षीच लग्न ठरवताना तो पत्नीला घेऊन आला होता. मला या नात्याचा अभिमान वाटतो.

असे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत. क्लास सोडून पुढील शिक्षणासाठी जाताना कितीतरी मुले भावुक होत असत. उत्तम गुण मिळाल्यावर त्यांना होणारा आनंद आजही मला आठवतो. आजदेखील गुरुपौर्णिमेला कित्येक विद्यार्थी फुले घेऊन येतात,काहींचे फोन येतात. बहुतेक विद्यार्थी आजही माझ्या संपर्कात आहेत. काही विद्यार्थी इंजिनियर, काही डॉक्टर तर काही सीए झाले आहेत. काहीजण पुढील शिक्षणासाठी परदेशी गेले आहेत. विशेष म्हणजे इकडे आल्यावर मला भेटण्यासाठी ते आवर्जून येतात. काहींना मी ओळखू शकत नाही. पण ते मात्र मला विसरले नाहीत. रस्त्याने जाताना , एखाद्या दुकानात अचानक एखादा विद्यार्थी समोर येऊन विचारतो,"मॅडम, मला ओळखलंत का?" खरं तर चेहरा ओळखीचा वाटत असतो पण नाव आठवत नसते. मग त्यांनी ओळख सांगितल्यावर खूप छान वाटते.  असे हे माझे अनेक विद्यार्थी आणि त्यांचे व माझे असलेले नाते मी हृदयात जपून ठेवले आहे. ते चिरंतन राहील.

vaijuphadake23@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

नातं- भाग २


🔸भावबंध नात्यांचे🔸
लेखन- सीमा उरुणकर

"बबड्या अरे बबड्या, हे काय? तू का पाणी भरतोय? मी आलीये ना ,सोड तू ती बादली,  मी आहे ना!!" हो हाच तो बबड्या.  हल्ली गाजत असलेल्या "अगबाई सासुबाई "मधला. हा बबड्या  आणि ती आसावरी यांच्यातील हा संवाद आणि हा प्रसंग पाहून मनोमन चीड आली. खरंच अशी असावी का आई? आभाळाएवढी माया करणारी आई; त्यापोटी मुलाला दुर्बल आणि आळशी बनवणारी ?आणि मग हि सिरीयल बघताना आसावरी,- बबड्या, शुभ्रा व आसावरी, दत्ताजी आणि आसावरी अशा नात्यांवर विचारांची शृंखला मनात घोळू लागली. या अनुषंगाने नात्यांचे वेगवेगळे बंध ,भावना व त्यानुसार रोजचे घडणारे अनेक छोटे-मोठे प्रसंग डोळ्यांसमोर तरळू लागले. खरंच सगळ्यांची संलग्न असणारा हा विषय म्हणजे नाते. हे नाते आई_ मुलं, नवरा बायको ,सासू सासरे _सून ,काकी ,आजी-आजोबा या सर्वांबरोबर असणारे हे नाते. प्रत्येकाबरोबरचे भावबंध वेगवेगळे, भावविश्व वेगवेगळे. पण प्रत्येक नात्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पदर फुलत जाणारे, प्रत्येकाकडून काहीना काही शिकणारे. 

आणखी असंच नातं ते म्हणजे मैत्रीचं ज्यामुळे स्वभावाची, वागण्याची बरीचशी जडण-घडण घडते. या मैत्रीमुळे बालवयापासून तारुण्य पर्यंत तर "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" या उक्तीप्रमाणे जर घडले तर व्यक्ती सर्वगुणसंपन्न होते तर अशी ही वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर असणारी वेगवेगळी नाती अगणित प्रकारची. पण या सगळ्या नात्यात अत्यंत आवश्यक असा गुण म्हणजे  विश्वास.!!! आई-वडिलांनीही मुलांना विश्वासात घ्यावे लागते व तोच विश्वास मुलांनीही सार्थ करावा लागतो. पती-पत्नी या नात्यात तर प्रेमापेक्षा विश्‍वास महत्त्वाचा ठरतो .या नात्यात एकमेकांचा आदर करण्याने, एकमेकांची किंमत योग्य पद्धतीने करण्याने, शक्य तेव्हा एकमेकांना सहकार्य करण्याने विश्वासाचे व प्रेमाचे नाते बहरत जाते आणि मग दोघांचे मनोमिलन केव्हा होते ते कळतही नाही .पण या नात्यात अलीकडे विश्वास व प्रेमाची बरीचशी जागा 'बरोबरी' या गुणाने घेतली आहे. सहनशक्तीची जागा 'मनमौजी' ने घेतली आहे. दुसऱ्यापेक्षा' स्व 'ला महत्व दिले जात आहे. तीच तर्‍हा सासू-सून या नात्यातही दिसून येत आहे .सासू नवीन पिढी बरोबर मिळते-जुळते घेत असतानाच मनाच्या तारेवरची कसरत करताना दिसून येत आहे. एकाधिकारशाहीचा वापर न करताही बरेचदा तिची अवहेलना होत आहे. हे असे का? या 'का' ची कारणे खूप आहेत परंतु उत्तर मात्र एकच आहे. ते म्हणजे विश्वास!!! एकमेकींना वाटणारा विश्वास !खरंतर या नवीन मुलींकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून सगळ्या प्रसंगाकडे बघण्याची नजर असते. 

काही प्रश्न त्या चुटकीसरशी सोडवतात म्हणून दोन्ही पिढ्या संवादातून बऱ्याच गोष्टी सोडू शकतात आणि त्यातूनच एकमेकांबद्दल  प्रेम व आदर वाढत जाईल, पण महत्वाचे म्हणजे ऐकून घेण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून असावी. नाते जपताना विश्वासाचा बरोबरच आणखीन एक  महत्त्वाचा गुण लागतो तो म्हणजे संस्कार. मोठ्यांचे आचार-विचार, कार्य पद्धतींचा बराच पगडा कळत न कळत मुलांवर होत असतो. एकत्र कुटुंबात हे संस्कार सगळ्यांकडून मुलांवर होत असतात .प्रत्येक व्यक्तीच्या विविध आवडीनुसार खेळ, वाचन, देवधर्म ,स्वच्छता या प्रमाणे मुलांवर छाप पडते आणि विविधांगांनी ती विकसित होत जातात .वाद-संवाद, प्रतिवाद यातून दोन्ही बाजूंचे आकलन होते .सर्वात शेवटी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सगळी नाती टिकतात, एकमेकांना बांधून ठेवतात ,बहरतात ती फक्त आणि फक्त स्त्री मुळे! हो, हीच स्त्री जी दोन्ही घराण्यांना जोडणारी दुवा असते, संस्कारांची पाठराखीण असते ,संस्कृतीची जाण राखीन असते ,घराची व्यवस्थापिका असते ,सहनशक्ती चे भांडार असते. साक्षात दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती चा संगम असते .आणि म्हणूनच विंदा करंदीकर आपल्या कवितेत स्त्री रूपांचे वर्णन असे करतात ,"तू घरभर भिरभिरत असतेस ,स्वागतासाठी सुहासिनी असतेस ,वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहीता असतेस, भविष्याकरता स्वप्न सखी असतेस.!!!!
  seemaurunkar@gmail.com Ichalkaranji
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात्याच्या रेशिमगाठी🔸
लेखन- सौ पल्लवी बेहेरे
 
 
 नातं म्हणजे आपुलकी माया, प्रेम, जिव्हाळा आणि सोबत. प्रत्येक नात्याचे एक वेगळेपण असते.  लहानपणी आई वडिलांची माया मिळते. आजी, आजोबा,  काका -काकू, आत्या मावशी, मामा-मामी अशा अनेक नात्यांची ओळख आपल्याला होते. त्यांचे प्रेम मिळते. शाळेत, बालवाडीत गेल्यावर आपल्याला खूप मित्र मैत्रिणी मिळतात, त्यांच्याजवळ आपली मैत्री होते. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांच्याबरोबर आपले प्रेमाचे नाते जोडले जाते. हे ऋणानुबंध आपल्याला कायम सोबत करतात.
          
लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीला अनेक नवीन नाती मिळतात. पत्नी, सून, जाऊ, वहिनी, काकू,  मामी अशा अनेक नात्यांनी ती नवीन घरात जोडली जाते. लग्न झाल्यावर  मुलांनाही अशीच वेगळी नाती जोडली जातात. विवाहामुळे दोन कुटुंबाचे एकमेकांशी नाते जोडले जाते अशा सर्व नात्यांनी आपले जीवन परिपूर्ण व समृद्ध  होत जाते. पती -पत्नीचे नाते हळुवारपणे जपावे लागते. कारण हे नातं म्हणजे "युगायुगाचे आपले नाते नको दुरावा असे असते."एकमेकांवरील प्रेमाने व विश्वासाने हे नाते जपत पुढची वाटचाल करायची  असते. नंतर नवीन  छोटया बाळाचे  आगमन होते. त्याचे संगोपन दोघांनी मिळून करायचे असते. आई -बाबा होणे ही आनंदाची  व समाधानाची परिपूर्ती असते. ते सुखाचे क्षण आपण मनोमन जपून ठेवत असतो. मुलांवर चांगले संस्कार करत असतो. नंतर त्यांचे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, लग्न या जबाबदारी आपण आनंदाने पार पाडत  असतो. नंतर जेव्हा नातवंडांची चाहूल लागते तेव्हा आपले आज्जी - आजोबा       
म्हणून प्रमोशन होणार हा आनंद असतो. आपल्या नातवंडच्या येण्याने आपला जीव सुपासारखा मोठा होतो. नातवंडाला न्हाऊ-माखू घालण्यात त्याला ओव्या म्हणून निजवताना दिवस वर्षे  निघून जातात. या वाटचालीत आपल्याला पतीची किती मोलाची साथ होती हे जाणवते. हे ऋणानुबंध असेच राहोत असे मला वाटते. 
           
वरील सर्व नात्यांचे अनुभव हे माझे स्वतःचे आहेत. मी माझ्या कल्पनेने त्याचा मागोवा घेतला आहे. माझे आयुष्य या सर्व नात्यांनी बहरून गेले आहे. आई -वडील, सासू -सासरे, माझ्या बहिणी व मुले यांच्यामुळे माझी वाटचाल सुखी झाली आहे. मला माझ्या पतीची समर्थसाथ, प्रेम व गाढ विश्वास आहे. म्हणूनच खालील काव्य ओळी ओठावर येतात. 
               "तुला सगळं देऊन सुद्धा माझी ओंजळ भरलेली पाहिले तर तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली."
                                    
pallavibehere35@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸आपलं नातं🔸
लेखन-  पल्लवी बेहेरे 

वाचन - कट्ट्यामुळे जुळले आपले नाते 
सर्वांचे लेख, कविता वाचून मन भरते 
प्रत्यक्ष भेटत नसलो तरी, नसतो अनोळखी 
परस्परांना शुभेच्छा देत, जुळतात नव्या  ओळखी 
नव्या कल्पना, नवे विचार यांची होते देवघेव
कधी भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ 
यातून विहरत राहतो हीच  ठेव 
अशीच नात्यांची, वीण विणू सारे जण 
प्रत्यक्षात कधी भेटू, याची वाट पाहत आपण. 
                   
pallavibehere35@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸सृजनतेचे नाते🔸
लेखन- सौ. दीपा पुजारी.

आज सकाळी गेटमधून बाहेर रस्यावर आले व नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी जवळच्या दुकानाकडे निघाले. मंद, शीतल, झुळुक आली आणि…..ओ….हो…..बरोबर बकुळगंध घेऊन आली. माझी पावले थबकली. माझ्यासाठी तिने पायघड्या घातल्या होत्या. सर्व वातावरणात धुंद, मंद, मधुर सुवास पसरवून तिने स्वत:ला आपल्या मातेच्या सेवेत समर्पित करून टाकले होते. तिचा हा सावळगंध सावळ्या मृदगंधेशी एकजीव झाला होता.

लहानपणी आई जवळच्या बागेत खेळायला घेऊन जायची. बरोबर सुई दोरा असायचाच. खेळून झाले की न चुकता ती मला बकुळीची फुले वेचून माळ करायला सांगायची. यातील तिचा हेतु त्या वयांत मला कळला नव्हता. पण आता लक्षात येते. बकुळीच्या (Mimusops elengi) सुवासाने व शीतलतेने व त्या नाजुकशा फुलांमधील सूक्ष्म छिद्रातून एकसर गुंफताना एकाग्रता, कोऑर्डिनेशन इ. गुण वाढीस लागायचे. अगदी ५-६वर्षांची होते तेंव्हा पासूनच बकुळीने माझे सावळेमन तिच्या सावळगंधाने व्यापले आहे.

माझी ही मैत्रीण शाळेच्या मैदानात पुन्हा भेटली. कोल्हापूरच्या म.ल.ग. हायस्कूल मध्ये. ही मुलींची शाळा म्हणजे राजवाड्याचाच एक भाग होती. तिला तशी शाळेची आखीव रेखीव इमारत नव्हती. पण राजवाड्याचे नक्षीदार दगडी खांब, दगडी पायर्‍या, कमानी, महिरपी वाल्या जाळीदार खिडक्या असा सरदारी, खानदानी व तरीही शालीन रुबाब होता. मैदानातील बकुळी भोवतीचा छोटासा पार खेळून खेळून दमल्यानंतर आम्हा मुलींचा विसावा बनत असे . NCC/Scout अशा मार्चींग साठी "Turn left" चा खास corner होता.

विद्यापीठ हायस्कूल जवळील अंबाबाई च्या देवळाचे जे दगडी प्रवेशद्वार आहे त्या पायर्‍यांवर बकुळीचे गजरे (वळेसर) विकणार्‍या मुली बसायच्या. पुढे मोठेपणी तिथून जाता येता माझे पाय थांबायचेच. खिशाने फारशी श्रीमंत नसूनही मी ते सावळे एकसर खरेदी करायचीच. या एकसरांनी माझ्या काही पुस्तकात व कपडेपटात अजूनही गंधसुरांची मैफल व आठवणींची सुरावट जपली आहे. आज ते सर अधिकच गहिरे, सावळे नाही नाही, गडद तपकिरी झाले आहेत व माझ्या आठवणींचे रंगही तितकेच गहिरे….

सकाळी याच रस्यावर बूचाच्या फूलांचाही सडा असतो. चारच पांढर्‍याशुभ्र पाकळ्या व लांब किंचित पोपटी पण पांढरा च देठ. चार पैकी दोन पाकळ्या जोडीच्या. याही झाडाला माहिती आहे फक्त देणे. ही फुले तर उलटीच लटकलेली असतात फांद्यांवर. परागीभवन झाले की झेपावतात जमिनीकडे. डांबरी रस्ता, बाजूला लाल माती आणी त्यावरील हा पांढरा फुलसडा! मन वेडावून जाईल नाहीतर काय? याही फुलांची माझी ओळख माझ्या शाळेने करून दिली. घराला जसे परसू असायचे ना तसे आमच्या शाळेला परसातले छोटे पटांगण होते. तेथे उंच ऊडी लांब ऊडी इ. खेळ खेळले जायचे. याच पटांगणाच्या एका बाजूला ही बुचाची झाडे (Milingtionia hortensis) होती अगदी एका रेषेत. पण या आकाशनिंबाला बुचाचे झाड का म्हणतात हे मात्र विज्ञानाच्या तासालाच कळले. काचेची निर्मिती झाल्या नंतर काचेच्या बाटल्या तयार होत पण त्यांचे टोपण मात्र करता येत नव्हते. तेंव्हा या झाडाचे खोड बूच करण्यासाठी वापरले जाऊ लागले व झाडाचे नामकरण झाले बूचाचे झाड. झोकून देणे म्हणजे काय हे यांनाच माहित. आणी त्यासाठी ही फुले उमलतातच मुळी उलटी, सहजपणे गळून जाण्यासाठी

निसर्गाशी नाते जपण्याचं काम सर्व वनस्पती करतात. मातीतून पाणी, खनिजे,जीवनतत्त्वे घेतात तशीच ती मातीला परतही करतात. पाने, फुले, फळे बिया अशा अनेक रुपात ही परतफेड सुरु असते. किंबहुनापुनश्च मृद्गंध बनणे हेच यांच्या फुलण्याचं खरं ध्येय असते. ही दान करण्याची कला निसर्ग सातत्याने शिकवत असतो. 

     "प्राजक्त, कुंदा, मधुमालती नावे तरी किती
      समर्पणाने सांगती देण्याची महती
      तयांना संपन्न करुन गेली ही धरती
      ऋण फेडण्या तयेचे सुमने ती वर्षिती

      तिच निर्मिती,तिच फुलविती,रुजविती
     आंधळे मनुजन तया पदी तुडविती
     उमगेल मनुजा कधी तरी ही ऋतुगती
     हसेल अवनी आनंदुनी वर्षुनी जलपाती "

खरेच, कळेल का माणसाला निसर्गाशी असलेले त्याचे नाते? किती प्रकारे या फुलांनी, फळांनी, वृक्षांनी समजावले? मातीपासून निर्माण होऊन पुनश्च मातीच होण्याचे इंगीत अंगी बाणणे, कृतीत आणणे व हे ऋतुचक्र अविरत फिरते ठेवणे यासारखी दुसरी परतफेड नाही. 

लताजींच्या गाण्याप्रमाणे,

  "रहे ना रहे हम, मेहेका करेंगे   
  बनके कली, बनके सबा बागे वफा़में"

हे ज्याला कळले त्यानेच माणुसकीचे, मानवतेचे, सृजनाचे नाते या निसर्गाशी जोडले असे म्हणावेसे वाटते.

deepapujari57@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸आईची आई🔸
लेखन- सौ. दीपा पुजारी

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-GaintsCauseway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. "चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर." ती हातात लॅच की घेऊन ऊभी. तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे…."आई,२० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा" "बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे." असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. "आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं."

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

deepapujari57@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸डब्यातलाW  शिरा🔸
 लेखन- डॉ अनुराधा कुलकर्णी 

   आयुष्यात बऱ्याचवेळा असं होतं की, आपल्याला कुणालातरी थँक यू,सॉरी म्हणायचं  असतं. एखाद्या गोष्टीला दाद द्यायची असते,पण राहूनच जातं. बऱ्याचदा अनवधानाने, क्वचित जाणूनबुजून! असो! मी २रीत असतानाची गोष्ट आहे.वडील शिक्षक असल्याने बदल्या असायच्याच! त्याचवर्षी आईलाही नव्यानेच नोकरी मिळाली होती. तिची शाळा सकाळी ६.५०ला व माझी ७.३०वाजता.ती तिच्याबरोबरच न्यायाची मला कारण शाळा घरापासून लांब होती.शाळेचा पहिलाच दिवस होता तो! आम्ही डबा न घेताच निघालो.
मधल्या सुट्टीत बाईंनी सांगितलं सगळ्यांना, 'हं, आता मधली सुट्टी, डबे खा.' माझ्याकडे डबा नव्हता. कावरीबावरी होऊन मी जागेवरच बसून राहिले.बाईंच्या ते लक्षात आलं. त्यांनी सर्वांना विचारलं,'आज आपल्यात एक नवीन मैत्रिण आलीआहे .कोण बरं तिला आपल्या डब्यात घेणार?'
        
एक गोरीपान छोटुकली मुलगी पळतपळत माझ्याजवळ आपला डबा घेऊन आली व हाताला धरून मला म्हणाली,' चाल,आपण डबा खाऊया!'बाईचाही चेहरा समाधानाने खुलला. स्टीलचा छोटा पेढीघाटी डबा तिने उघडला. तूपातला शिरा होता त्यात! दोघींनी मिळून फस्त केला.किती सहजपणे, निर्व्याजपणे केलं होतं तिनं हे सगळं! कधीतरीच आम्हाला बर्फाचा गोळा खायची संधी मिळायची.पर्वणीच असायची ती! तिची माझी घट्ट मैत्री झाली.  पुढच्या वर्षी पुन्हा बदली झाली व आम्ही दुसऱ्या गावी गेलो. त्यानंतर असंख्यवेळा अनेक प्रकारचा शिरा केला, खाल्ला,खाऊ घातला,पण त्या डब्यातल्या। शिऱ्याची सर खरोखरच कशालाच नाही आली!ती निर्व्याज मैत्री, प्रेम,निरागसता,निरपेक्षता अविस्मरणीयच!प्रत्येकवेळी शिरा करताना मला ती हटकून आठवतेच!खरंतर  आता मी तिचं नावपण विसरले.पण त्या डब्यातल्या शिऱ्याने मात्र मनात घर केलंय, कायमचं!

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी            
              

Sunday, June 14, 2020

नातं- भाग १

🔸कृष्ण सखा🔸
लेखन-अश्विनी शिरूर

नातं हा विषय मोठा गहन आहे. निर्जीव वस्तूंपासून झाडाझुडपापर्यंत, आणि प्राणी पक्ष्यांपासून माणसापर्यंत प्रत्येक नातं वेगळाच अनुभव देऊन जातं. कधी अविस्मरणीय, तर कधी अविश्वसनीय. नात्यानात्यातले संबंध, ऋणानुबंध, प्रेम आणि जिव्हाळा, तर कधी हेवेदावे, रुसवेफुगवे, द्वेष आणि तिरस्कार. नात्यांबद्दल जितकं लिहावं तितकं थोडं.

मला कृष्णाच्या तीन प्रेमाच्या नात्यांबद्दल आज इथे सांगायचंय. आणि प्रेम तरी किती वेगवेगळ्या प्रकारचं! 

राधा
राधेचं कृष्णाबरोबरचं नातं हे नेहमीच सर्वांच्या आदराचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गोकुळ सोडून गेल्यानंतर कृष्ण कधी परतून आला नाही, पण राधा-कृष्णाचं नातं मात्र चिरंतन राहिलं. राधेचं प्रेम निरपेक्ष होतं. तिने कृष्णाकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. जेव्हा कृष्णाने विचारलं की तुला काय हवंय, तेव्हा तिचं उत्तर होतं की "कृष्णा, तू दुःखात असशील तेव्हा माझे नाव घे. तुझी शारीरिक, मानसिक पीडा तू मला दे. कारण सुख चार क्षणांचे, तर दुःख चिरकालाचे सोबती असते. त्यामुळे मी कायम तुझ्या सोबत असेन."
या प्रेमाला उपमाच नाही. प्रेमाच्या प्रांतात कुणाचं उदाहरण दिलं जातं तर ते राधेचंच. जन्म-जन्मांतरीच्या विश्वासाचं, त्यागाचं आणि समर्पणाचं असं हे नातं.

द्रौपदी
द्रौपदी ही कृष्णाची सखी होती. कृष्णाने द्रौपदीच्या बाबतीत मित्र, तत्वज्ञ, सल्लागार, पाठीराखा या सगळ्या भूमिका निभावल्या. व.पु. म्हणतात त्या प्रमाणे, पांडवांसारखे बलाढ्य पाच पती असून सुद्धा द्रौपदीसाठी कृष्णाशी नातं हे प्रगल्भ आणि अतिशय तरल अशा मानसिक स्तरावरचं होतं. द्रौपदीचा कृष्ण वेगळाच होता. मित्र ही संकल्पना त्याने पूर्णत्वास नेली. शेवटी वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीने धावा केला तो कृष्णाचाच. आणि तो त्वरेने तिच्या मदतीस आलासुद्धा. द्रौपदी बरोबरचं त्याचं नातं हे मैत्रीचं, तिचा संताप, त्रागा, निराशा, हतबलता  समजून सर्वतोपरी समजून घेण्याचं आणि कणखर पाठीराख्याचं.

रुक्मिणी
रुक्मिणी ही कृष्णाची अर्धांगिनी. त्यांचा प्रेमविवाह. शांत आणि सौम्य स्वभावाच्या रुक्मिणीने कृष्णाचे मन जिंकून घेतले. जेव्हा सत्यभामेने अहंकारापोटी कृष्णाची तुला करायची ठरवली, तेव्हा रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने जगाला हे दाखवून दिलं, की माणसाला प्रेमानेच जिंकता येते. असं म्हणता येईल की कृष्ण आणि रुक्मिणीचं प्रेम हे निःशब्द, समंजस  आणि आत्मिक स्तरावर अत्युच्च प्रकारचं होतं.  शब्दांनी त्याचं वर्णन करता येणं अशक्य आहे. 

कृष्णाने एकूणच प्रत्येक नातेसबंधाला एक वेगळंच परिमाण दिलं. जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या स्त्रियांना सामाजिक स्थान मिळावे म्हणून त्याने त्यांच्याबरोबर विवाह केले. हे त्याचे स्त्री-मनाचा विचार करणे बऱ्याच जणांना रुचले नाही, पण त्याने ते केले. 

महाभारतासारख्या जुन्या काळात कृष्णाने स्त्रियांबरोबरच्या नाते संबंधाबद्दल क्रांतिकारी विचार, निर्णय आणि कृती केली. कृष्णाने प्रत्येक नात्याची मर्यादा राखली आणि जगाला हे दाखवून दिलं की ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची नाती एकाच वेळी कशी निभावायची. त्याचा एक वस्तुपाठ त्याने घालून दिला जो आज ही आदर्श आहे.

ash.shirur98@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
 
🔸मी नुकतंच एक नातं विणायला घेतलं होतं🔸
 लेखन- डाॅ.श्रुती

मी नुकतंच एक नातं विणायला घेतलं होतं
नवीनच सुरुवात होती,
धागेही रंगीबिरंगी होते.
सुंदर एका नक्षीचं स्वप्नही पाहिलं होतं.
पण प्रत्यक्षात काढताना कळालं की,
प्रत्येक नक्षी तशीच कधी जमत नसते.
शेवटी स्वप्न हे स्वप्नच असतं.
प्रयत्न सुंदर करण्याचाच होता, प्रत्येक टाका सुंदरच व्हावा याचे आतोनात प्रयत्न चालले होते.
नक्षी वेगळे वळण घेऊ लागली की, सावरण्याचा प्रकार चालू होता.
नात्यांप्रमाणे धाग्यांचे ही रंग बदलावे लागत होते.
कधी धागा मोठा व्हायचा, गुंता बनायचा,
तो अलगद सोडवावा लागायचा.
अगदी तुटत चाललेल्या नात्यांचा सोडवावा तसा.
तर कधी धागा लहान बनवायचा, नातं टिकवण्याची तडजोड करावी तसा पुरवून वापरायचा.
या विणण्यानं बरंच काही शिकवलं.
विणताना कधी धाग्याला गाठही घालावी लागायची,
पण नवीन सुरुवातीसाठी.
तर कधी गुंता न सुटल्यानं धागा कापावाही लागायचा.
मागचे दोन टाके उसवण्याच्या तयारीनेच.
प्रयत्न सुंदर करण्याचेच चालले होते.
आपलं नक्षीदार नातं कसं वेगळं बनेल याचे.
कधी वेगवेगळ्या टाक्यांनी,
तर कधी वेगवेगळ्या रंगांनी सजवायचं चाललं होतं.
मी एक नातं नुकतंच विणायला घेतलं होतं.
मी एक नातं नुकतंच विणायला घेतलं होतं.

shrutiapatil93@gmail.com
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸वृक्षराज🔸
लेखन- सौ.हेमा दत्तात्रय देशपांडे

खरंतर जन्मतः कितीतरी नाती बरोबर घेवूनच आपण आपलं आयुष्य सुरु करतो.
बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या निसर्ग शृंखलेत नात्याची शृंखलाही वाढतच जाते.
अधिकाधिक नाती निर्माण होतात, बहरतात, मजबूत होतात आणि आनंद देतात.
असंच माझं एक नातं तयार झालं, माझ्या दारी उभ्या असलेल्या डरेदार, हिरव्यागार, वृक्षराज बेलाशी!

पानगळती संपून वसंताची चाहूल लागताच, सुंदर कोवळी-कोवळी पोपटी पालवी फुटू लागली होती. पांढऱ्याशुभ्र मोहक वासाच्या फुलांनी आणि छोट्या छोट्या कळ्यांनी सारा परिसर मोहरला होता. मधमाशांची परागकण गोळा करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. छोट्या मोठ्या विविधरंगी चिमण्यांचा चिवचिवाट, पाखरांचा किलबिलाट आणि कोकिळेचा आलापही सुरु झाला होता. या बरोबरचं त्या हिरव्या कंच बेलात सुखेनैव बसून भारद्वाज जोडीचा प्रेमालापही सुरु होता. मग मी ही या चौफेर पसरलेल्या वृक्षराजाच्या सावलीत सारं काही विसरून आज बसले नसते तर नवलच झालं असत. त्या सावलीत विसावता क्षणीच,  मनातलं सारं काही विसरून मी नतमस्तक झाले, माझे हात अपोआपचं जोडले गेले आणि माझा जणू या जगाशी सबंधच संपला आणि वृक्षारजाशी संवाद चालू झाला. 
त्याचा प्रवास डोळ्या समोर उभा राहताच एक प्रश्न मी त्याला केला....
“पानगळतीत अक्षरशः पान न पान गळून नुसत्या सुक्या काड्या सांभाळणारा वृक्षराज, तो तूच का रे..?
तुझ्यात एवढा बदल..?”
वृक्षराज हसून उत्तरला, अग वेडे मीच तो ..! 
तेंव्हा न डगमगता खंबीरपणे उभा राहिलो म्हणूनच,आज मी तुला बहरलेला दिसतोय, किंबहुना आज मी अधिकच बहरलेला आहे. हो ना...?
त्याच्या या उत्तरात मला एक नवीन शिकवन मिळताच मी स्वतःशीच बोलू लागले...
अरे खरंच कि ग्रीष्म हा वसंत ऋतूला घेवूनच येतो किंबहुना वसंताची चाहूल ग्रीष्मच देतो. आज मनासारखं झालं नाही म्हणून खचून जाण्यात काय अर्थ आहे, उद्याचा वसंत माझाच असणार आहे आणि खरं सुखं हे भरभरून देण्यातच आहे, हे मला लक्षात येताच आता आपणही वाचन कट्ट्याच्या निमित्तानं भरभरून वाचायचं,लिहायचं अधिकाधिक सख्या जोडायच्या. बिलवरजासारख आनंदी,  समाधानी राहून, भरभरून आलेले क्षण अनुभवायचे, त्याच्याकडून मिळालेली ही ताकत, उर्मी घेवून आयुष्यातील चढ-उतार सहजपणे पार करायचे असं निर्णय मी त्या दिवशी घेतला.
आता पुन्हा माझ्यातील शिष्या वृक्षराजाला नतमस्तक होऊन म्हणाली....

कृतज्ञ मी या तुझ्या मोलाच्या शिकवणीसाठी,
पण विनंती तुला, माझी अजून एक मागणी पूर्ण करण्यासाठी..!
देवू करावी आम्हा सर्वांस, तुझ्यासारखीचं ताकत, दातृत्व, आत्मविश्वास आणि मनाची खंबीरता, आयुष्याच्या पुढील सुखकर प्रवासासाठी..!
आयुष्याच्या पुढील सुखकर प्रवासासाठी..!

ऐस-पैस पसरलेल्या फांद्यानी आशीर्वाद देत तो ही लेगेच त्याच्यातल आणि माझ्यातलं नातं अजून दृढ करीत म्हणाला....

“तथास्तु..! 
इच्छित मनोरत सिद्धरस्तु..!शुभमभवतु..!"
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
 
🔸नातं-अंगणाशी🔸
लेखन- सुचेता पाटील

 सडा रांगोळीनं सजलेल्या अन् चिमण्या-पाखरांच्या चिवचिवाटानं , गलक्यानं गजबजलेल्या अंगणाचं नि माझं. अंगण म्हणलं कि,स्वच्छ झाडून सडा टाकून रांगोळी नटवलेले असंच अंगण आपल्या डोळ्यासमोर येतं-ज्या अंगणात प्रवेश केल्याबरोबर प्रसन्न वाटतं पण माझ्या अंगणात पाय ठेवल्याबरोबर फक्त प्रसन्न वाटत नाही तर फुलांच्या बहरण्यानं मन बहरतं,चिमण्यांच्या थुईथुई करण्याबरोबर नाचायला लागतं.
        
रोजची - दिवसांची सुरुवातच माझी अंगणापासून होते. सकाळचा केर-वारा,सडा रांगोळी,पक्ष्यांचं खाणं-पिणं कोणत्या झाडाला किती फुलं लागलीयेत हे बघणं ही पहिली कामं. या कामांची इतकी सवय झालीय ना; झोपेतून उठताना डोळ्यासमोर आधी अंगण येतं. स्वप्नही चक्क अंगणाचीच पडतात. त्यामुळे त्यामुळे मला वाटतं आपलं किती घट्ट नातंय ना या अंगणाशी. मी अंगणासाठी काही करतेय की अंगणाने मला काय दिलंय हा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा समोर येतो तेव्हा अर्थातच 'अंगण' जिंकत. काय नाही दिलं या अंगणा मला. सगळ्यांना वाटतं मी अंगणाची खूप सेवा करते. अशी शेखी मिरवण्याचं कारणच नाही. कारण एका हातानं मी दिलं असेन तर अंगणानं शंभर हातांनी भरभरून देवून मला समृद्ध केलं.

महाराजाधिराज श्रीमंत भारद्वाज यांचं दर्शन या अंगणामुळं सहज शक्य होतं. पोपटरावांची तरी खूप सेवा करायला मिळाली. दिवसातून बऱ्याच वेळा बुलबुल्यांच्या गप्पा ऐकायला मिळतात. भांडतात की बोलतात कळतं नाही पण मज्जा वाटते. सातभाई ओरडून ओरडून परेशान करतात.पण सावधही करतात हं- कुठं साप वगैरे आलाय का बघा म्हणून. साळुंक्या, शिंजीर, शिंपीमामा, होलेश्वर ,चिरक,टिट...एक का दोन एवढ्या सगळ्या पाहुण्यांची उठ -बस चालू असते माझ्या अंगणात. आमचे भाऊबंद असलेल्या वानरांची फौज तरी दर पंधरा दिवसांनी आली की चांगलीच धुमाकूळ घालून जाते. अंगणात चांगली पंगत बसते. त्यांच्या मेजवानीची सरबराई करता - करता दिवस संपतो. पाळलेले नसले तरी काही ही कुत्रे अंगणात येऊन भेट देऊन जातातच. त्यांना तसंच कसं पाठवायचं म्हणून काहीतरी देणं आलंच. सुगरणी एरव्ही जास्त येत नाहीत पण जेव्हा हळद लावून नटून थटून होतं तेव्हा लग्नाला आल्यासारख्या येतात त्या पूर्ण पावसाळा संपेपर्यंत अंगण सोडतच नाहीत. त्या वऱ्हाड मंडळींची मग खाण्या- पिण्याची भक्कम सोय अंगणात करावी लागते. काहीही असो माझं अंगण मात्र तेव्हा एखाद्या लग्न मंडपसारखं दिसतं. सगळीकडे आनंदी - आनंद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'चिऊताई ये, चारा खा,पाणी पी' किंवा 'एक घास चिऊ ताईचा' पासून अंगण- मी- अन् चिऊताई या आमच्या नात्याचा त्रिकोण आखला गेला ती 'आपली' चिमणी... सतत- सतत-राबता असतो तिचा. या घरात जाऊ का त्या घरात जाऊ असं म्हणत आम्ही अंगणात लावलेलं एखादं घर पकडायचं नि मग झालं त्यांचं त्या घरात घर बनवणं, मग बाळंतपण, पिलांना भरवणं, मोठं करणं, उडायला शिकवणं हे सगळे सोपस्कार अंगणात. तिच्याशिवाय आमच्या अंगणाला शोभाच नाही असं होऊन बसलंय आता.

वर्षभर माझं अंगण सदा न नकदा बहरलेलंच असतं. प्रत्येक सिझनच्या फुलणाऱ्या झाडांनी नटलेलं असतं. सुगंधाने दरवळलेलंच असतं.सीतारंजन, पारिजातक , सप्तपर्णी, रातराणी कशाकशाचा सुगंध घेऊ असं होतं. कुंतीचे गुच्छ सारखे खुणावत असतात. त्यांचा वास आधी घ्यायचा की त्याच्या सुंदरपणाला बघत बसायचं? बहाव्याच्या झुंबरांची नेत्रदीपक रोषणाई बघताना अंगणात उत्सव आहे असं वाटतं. त्याच्या पिवळ्याधम्मक चंद्रकोरींच्या नि पाकळ्यांच्या पायघड्या खाली गालीचा सुंदर अनुभव देतात. पिवळ्या फुलांसोबत पिंगा घालणाऱ्या काळ्या भुंग्यांची भून-भून वाटत नाही. माझा आवडीचा नेवरा!... त्याचं काय वर्णन करू? बहाव्याच्या पिवळ्या दुलईवर माणकं जडवल्यासारखं ही वाटतं.कधी गडद केशरी रंगाचा -पुष्कराजासह केशरीया बिछाना अच्छादल्याचा आभास. असा रत्नराशींचा वर्षाव करून बहावा अन् नेवर्यानं माझं अंगण खूप समृद्ध केलंय. अंगणावरून घराची संस्कृती कळते म्हणतात.पण माझ्या अंगणावरून माझी समृद्धी-श्रीमंती कळते. हो ना?
सासरी आल्यानंतर हळूहळू अंगणाशी माझं नातं असं जुळत गेलं.पण अंगणाशी माझी नाळ तर तेव्हाच जोडली गेली होती जेव्हा आज्जीनं अंगणातील धान्य पक्षांना निवांतपणे खाऊ दिलं आणि आईने सडा - रांगोळीची सवय लावली .

मायेनं विणलं की प्रत्येक नातं घट्ट होतं. ते सहज उसवलं जात नाही. असं माझं नि अंगणाचं नातं विणत गेलं, वीण घट्ट होतं गेली. ती कधीही बसवणार नाही याची काळजी मात्र मी नेहमी घेत राहीन.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🔸नात-उर्दू शायरीशी🔸
लेखन- सुचेता पाटील


'उर्दू शायरी- मेरी पसन्द' ही पसंद नात्यात कशी बदलली कळालंच नाही. शाळेत असताना आजोबा बऱ्याच शेर- शायरी सांगत.त्यांनी सांगितलेला पहिला शेर आजही मला आठवतोय.
     
खुदको खुद मे  ढुॅंढ,  खुदको दे निकाल,खुदको निकाल देने से, खुद खुदा हो जायेगा.
त्याच्या अर्थाची गहराई मला वेड लावून गेली. दैनंदिनीच्या प्रत्येक टप्प्यावर मी तो शेर आजमावत असते.आजही. ही साथ शेवटपर्यंत असणार आहे.आपले पाय जमिनीवरच राहण्यासाठी हे उपयुक्त आहे. आपला मानीपणा किंवा आपल्यातला अहंकार गळून पडल्याशिवाय आपण मोठे कसे होऊ?खुदा व्हायचंय ना. माझ्यातला मी पणा निघालाच पाहिजे.

नुक्ते की फेरपालट से हमसे जुदा हुआ,नुक्ता पलट देने से खुद खुदा हुआ.
हा शेर त्यांनी मला आधी अक्षर शिकवून मग ऐकवला.अक्षरं माझ्या आजही लक्षात आहेत. त्यातली गंमत पहा म्हणजे समजेल.
 خدا -जुदा جد-खुदा
नुक्ता म्हणजे टिंब/अनुस्वार. अक्षर एकच आहे. पण फक्त एका नुक्त्याने किती करामत केली. फक्त जागा बदलली.खालचा नुक्ता वर जाऊन बसला. एकदमच वरचा खुदा होऊन गेला.आपल्यालाही खालून वर जायचंय. तळातून उठून चारित्र्याच्या उंच शिखरावर जाऊन बसायचं आहे. भगवान बनायचं आहे.प्रसंगाला अनुसरून त्यांची शायरी चालायची उदा.-
 सैर कर दुनिया की गाफील जिंदगानी फिर कहाॅं,जिंदगी  गर कुछ रही तो नौजवानी फिर कहां...अशी.
अध्यात्माचा बाज असलेली त्यांची शायरी वेगळाही प्रवास करायची.
दो नान पुख्ते बुदंम, कुत्र्याने घेऊन गेला, समशीर बरकशीदंम ,नाल्याचे पार गेला.
 अशा प्रकारचे शेर ऐकायला गंमत वाटायची. ते स्वतः ते तयार करून ऐकवत. साहित्याचा तो एक प्रकार आहे म्हणे. त्यांनी सांगितलेलं मला आठवतं नाही.
       
आता अशा विविधतेतून माझं शायरी प्रेम प्रवास करत होत. हिंदी-मराठी शायरीचांही परिचय होत गेला. नातंही जोडत गेलं.या प्रवासात अगदी समरसून साथ देणारी मैत्रीण होती. जया. (जयश्री सोळंके) जिवाभावाची बालमैत्रीण. कागदाचा पुडा जरी आला, त्यावर शेर शोधायचो. सापडायचाही. रद्दीत, लायब्ररीत असो किंवा कोणाचं घर- मासिकावर झडप पडलीच म्हणायची.त्यातल्या कथा- गोष्टींवर लक्ष नसायचं.असायचं फक्त गजल सापडते का?कि एखादी शायरी किंवा एखादा शेर इकडं. रेडिओवरच्या गजल बरोबर आमचा पेन चालायचा. कॅसेट खरेदीही फक्त गजलचीच. झपाटल्यासारखे शेर गोळा करायचो.दोघींनाही ही एकच ध्यास.शेरो-शायरी.लग्न झालं. मार्ग दोघींचेही ही बदलले. पुढच्या प्रवासात आजूबाजूचे, मित्र- मैत्रणी,नवरा इतर नातलग सगळे असेच दर्दी असतील तर किती बहार येईल असं वाटलं होतं. पण तसं कोणीच भेटलं नाही. शायरीचं माझं नातं मात्र तसंच राहिलं. मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं.त्याला जास्त वाढवता किंवा दृढ करता आलो नाही. कैफ भोपालीनं  म्हणल्यासारखं -
      गुल से लिपटी हुई तितली को गिराकर देखो,आॅंधीयो, तुमने दरख्तो को गिराया होगा
 तसं माझं शायरीला चिटकून आहे.
        
मातृभाषेवर माझं खूप प्रेम आहे. पण रमते मात्र मी उर्दू-हिंदी शायरीतच. कारण हैदराबाद स्टेटच्या निजामाच्या अमलाखाली असलेला आमचा प्रदेश आपसूकच उर्दूचा प्रभाव. (शाळेतही ही अन् बोलीभाषेवर ही)अनुषंगाने हिंदी आलीच. यांनीच तर माझं नातं शायरीशी जोडलं होतं. भाषा महत्त्वाची नाही. भाव महत्त्वाचा आहे. भावावरून आठवला म्हणून एक शेर - बिना भाव बाजार मे वस्तू मिले न कोय,बिना भाव रीझे नही नटवर नंदकिशोर
 अगदीच नाही असे नाही. या प्रवासात अगदी थोड्या वेळापुरते काही सहप्रवासी भेटले. त्यांच्याकडून थोडी- थोडीशी शिदोरी मिळत गेली. आमच्या एक मॅडम होत्या डॉ.सुलभा मुरलीधर. माझ्या हिंदी प्रेमापोटी त्यांनी मला फार महत्त्वाच्या चार ओळींचा संदेश दिला.मॅडमना पण त्यांची मैत्रीण उस्मानाबाद चे मंत्री पद्मसिंह पाटलांची बहिण होती त्यांनी दिला होता. त्या चार ओळी माझ्या प्रत्येक डायरीच्या पहिल्या पानावर जागा धरून बसतातच. जसा पहिला शेर ही बसतो तसा. त्या ओळी अशा -
     तुम औरों को हॅंसते देखो मनु तुम हसो और सुख पाओ,अपने सुखो विस्तृत करो,सबको सुखी बनाओ

 पुढे जेष्ठ साहित्यिक, कवी- डॉ. जयशंकर प्रसाद अभ्यासताना या ओळींची माझी छान ओळख झाली. जसा माझ्या आजोबांचा पहिला शेर सतत माझ्यासोबत असतो. तसंच हर घडीला मी या चार ओळींचं विस्मरण होऊ देत नाही. मध्येच एक जबरदस्त शिदोरी मिळाली होती. एका सहप्रवाशांकडून पण तिची गोडी मला जास्त वेळ अनुभवता आली नाही. भाऊसाहेब पाटणकरांचे साहित्य. माझ्या मैत्रिणीच्या यजमानांनी माझी आवड बघून मला ही शिदोरी दिली होती. उमेश कुलकर्णी. यांची ही शिदोरी मी पुढं घेऊन जाऊ शकले नाही.
       
उर्दू शायरी बरोबर मी माझं हिंदी प्रेम हे जपलं होतं. या प्रवासाचं सगळ्यात मोठं स्टेशन मिळालं होतं. गुरुदेवांच्या चरणांचं. प्रज्ञाश्रमण अमित सागर महाराज. त्यांच्या कडून अफाट खजिना मिळाला. ते म्हणतात -
      अच्छाईयाॅं  देखले बस तू सारे जहान की,बुराईयों का कहीं कोई अंत नहीं दिखता
        तमाम उम्र यही सोचते हुए गुजरी कि,अपने बारे में कुछ सोचना जरुरी है!
        हे आत्मन! आत्मीयता अमृत की प्याली है,सांझ की नही, सुबह की लाली है
       संकेत से नही ही वचनं से भी चुप रहो,बातो से ही बात नहीं चरित्र से भी कुछ करो
 या अशा प्रकारचे भाव- देशप्रेम, धर्मनिष्ठा,अध्यात्म अशा विविध पैलूंचा खजिना त्यांच्याकडून भरपूर मिळाला. शायरीनं जिंन्दादिली दिली. गम-खुशी से अनेक अनुभव दिले. चिंता दिली. आनंद दिला. भावनांचे विविध पैलू दिले. सध्याची सामाजिक परिस्थिती बघताना असं वाटतं.-
         हरण लंकेश करके ले गया था जिस्को त्रेता,उसी युग से जलाई जा रही है आज तक सीता
मुझे मानव की पीडा चैन से रहने नहीं देती,पढी जब भी हृदय से मैने मानव प्रेम की गीता
 पण दुसर्या क्षणाला स्वत:ला सावरताना असंही वाटतं-
        दु:ख नहीं कोई कि अब उपलब्धियों के नामपर,और कुछ हो या न हो, आकाश छाती तो हे
 म्हणजेच मानवी मनाचे तरंग शायरीतून व्यक्त होताना दिसतात. त्यासाठी शायरीचं महत्व सांगताना म्हणावं वाटतं-
       ये शायरीयाॅं नहीं फूल की खिलती कलियाॅं है,जिनका रस ले- लेकर हम सब झुमा करते है
आजोबांनी शायरीची ओळख करून दिली. तिचं नातं जोडलं गेलं. या शायरीतून खुदाचीही ओळख झाली. गुरूंनी मोक्षाची ओळख करून देताना आशीर्वाद दिला होता या शायरीतून-
      जिनेन्द्र देव अक्षय जेता, उन्हे कहते है मोक्ष नेता!पाना यदि तुम्हें है मोक्ष को तो,ध्याना पडेगा निज में 'सुचेता'
आज मनाच्या कोपऱ्यात जरा डोकावून बघितलं, खूप सापडलं. पण तेवढं सगळं देऊ शकत नाही ना. म्हणून एवढंच.
धन्यवाद.
suchetapatil1792@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी