Tuesday, August 18, 2020

नातं- भाग ५

🔸नातं -कोरोनामुळे जडलेलं🔸 
लेखन - सुषमा कौस्तुभ दातार

        १५ मार्चला साऱ्या जगाबरोबर आपल्या देशात ही कोरोनाने हाहाःकार माजवायला सुरुवात केली. माझा मुलगा धृव याच्या कार्यालयातील पुढील महिन्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आणि म्हणून तो18तारखेला पुण्याहून  इचलकरंजीला आला. धृव बरोबर दोन छोटे पाहुणे आमच्या घरी आले. दोनच दिवसापूर्वी धृवने त्यांना आमच्या पुण्यातील घरी आणले होते. अगदी छोटे दोन महीन्याचे.नुकतच बाहेरच दूध पिऊ लागलेले. तुमची उत्सुकता आता फार ताणून धरत नाही. तर ही छोटी बाळं म्हणजे जीन आणि टाँनिक-मांजरीची दोन पिल्लं. गाडीतून छोट्या बास्केट मधे गप्प पणे झोपून आलेली ही दोन बाळं पहिले दोन दिवस घरात जरा घाबरून होती. पण दोन दिवसांत अशी काही रुळली की त्यांचच घर आहे. आता त्यांना येऊन महीना होऊन गेला आहे. घरभर नाचत असतात,पळापळी खेळत असतात. आंब्याची खोकी,दोरी, कागद, बाँल याचा घरभर पसारा केलेला असतो. त्यांना बाहेरच जग दिसावं म्हणून त्यांना पहिल्यादा अंगणात घेऊन गेलो तेव्हा थोडा वेळ बावरली,घाबरली.आमच्या आसपास फिरत राहिली. पण आता बघता बघता चिकूच्या झाडावर चढायला लागली आहेत. एक दोनदा पडली, उतरता आलं नाही पण चढायचं काही सोडलं नाही.सगळं करुन बघण्याची बालसुलभ उत्सुकता त्यांच्या कडे आहे. त्यांच्या मुळे आम्हीही रोज सकाळी अंगणात बसून चहा पिऊ  लागलो.पक्ष्यांचा चिवचिवाट, कोकीळेचे कूजन आणि जीन टाँनिकचं मुक्त खेळणं बघण्यात तासभर कसा जातो कळतच नाही.
यातील जीन आहे ना ती मांजरी आहे. त्यामुळे तिच्या मध्ये स्त्री सुलभ प्रेमळ पणा ,ज्यात त्यात नाक खूपसून बघण्याची वृत्ती आहे. आमच्या तिघांपैकी कोणी ही काहीही करायला लागलं की जीनबघायला पुढे.मला तर काही वेळा लहानपणीची मैथिलीच आठवते.तिच्याशी बोलायला लागलं की लक्ष देऊन तोंडाकडे बघत राहते. सारखी आमच्या आजूबाजूला फिरत असते. टाँनिक आहे तो बोका आहे. तो आधी भित्रा होता. पण आता तो एकदम शूर झाला आहे. पण तो जरा लांबलांबच असतो.जीन एवढा तो लाघवी नाही. आम्ही बसलो की लगेच दोघं मांडीवर येऊन बसतात. आपण अंगावर हात फिरवावा म्हणून अंग घासत राहतात. रात्री आम्ही टी.व्ही.बघायला बसलो की त्यांच्या अगदी अंगात आल्यासारखं एकमेकांवर उड्या मारत खेळत असतात.मग तो टीव्ही राहतो बाजूला आणि त्यांच्या मार्जारलीला पाहण्यातच वेळ कसा जातो कळतही नाही. टेबल क्लाँथला लटक,माझ्या अँप्रनच्या नाडीला लटक असे उद्योग सुरु असतात. मागून वर चढत खांद्यावर बसायचं आणि पुढुन खाली उतरायचं ,लांबून धावत येऊन हलणाऱ्या वस्तूंवर उड्या मारायच्या ह्या त्यांच्या सगळ्या करामती बघण्यात लाँकडाऊन कसा गेला कळलच नाही. ह्या लाँकडाऊन मुळेच त्यांच एवढं निरीक्षण करता आलं. नाही तर रोजच्या व्यापात एवढे लक्षातही येत नाही. जीन आणि टाँनिक यांच आमच्या जिंजरशी म्हणजे कुत्र्याशी कसं जमेल असं सुरुवातीला वाटलं होतं पण आता तोही त्यांच्या वर ओरडत नाही आणि तीही त्याला घाबरत नाहीत.दोघे एकमेकांकडे बघत बसतात. जीन आणि टाँनिकची आता एवढी सवय झाली आहे की त्यांचा इतका लळा लागला आहे ना की ती पुण्याला परत गेली की चैन पडणार नाही.त्यांना आता पुण्याला पाठवायचं की नाही असं झालं आहे. कोरोना मुळे झालेलं हे सुंदर नवीन नातं!अतिशय प्रेमाचं !मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, ती आपल्यावर खूप प्रेम करतात ह्याची जाणीव करून देणारं!!
        
sushamakdatar@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं-  माझंच माझ्याशी🔸
लेखन- तन्मयी कुलकर्णी

लॉक डाऊन वाढतच चालला आहे. सुरुवातीला मला खूप काळजी वाटली. नंतर आईबाबा, शेजारी पाजारी यांच्या बरोबर गप्पांचा फड जमू लागला. वाईटात चांगलं शोधता शोधता मज्जा येऊ लागली. खायचं, प्यायचं, झोपायचं, वाचन, टीव्ही.... मनात येईल तसं . नो रुटीन...   मी पुण्याला शिकायला गेल्यामुळं खूप दिवस घरी राहता यावं अशी मनोमन इच्छा होती; ती पूर्ण होऊ लागली, म्हणून मी खूष होत होते. पण नंतर नंतर कंटाळा येऊ लागला. काय करावं ? मिळालेला वेळ सत्कारणी घालवावा असं वाटू लागलं. किंडलवरची नवनवीन पुस्तक वाचणं, झुंबा, व्यायाम, खेळणं, नृत्याचा सराव, काही पदार्थ करून पहाणं ( पोटावर अत्याचार नाही हं केला !), आणि फोनवर  बोलणं ...असा दिनक्रम सुरू झाला. 
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सगळेजण आपापल्या नातेवाईकांना फोन करून चौकशी करत होते. अर्थात् माझ्या घरचेही त्याला अपवाद नाहीत. खूप वर्षांनी असा रिकामा वेळ मिळाल्यानं लांबचे नातेवाईक, शाळेतले मित्र-मैत्रिणी यांचे नंबर शोधून काढून त्यांना फोन केले जात आहेत. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. असे फोन करण्यामागचा उद्देश नात्यांना उजाळा देणं, नाती टिकवणं आणि तिची जोपासना. 
            
पण माझ्या मनात खूप दिवसापासून एकच प्रश्न पडत होता की, आपण नेहमीच दुसऱ्यांना  फोन करून विचारतो, "कसे आहात तुम्ही?" इ. इ. त्यांची प्रेमानं चौकशीही करतो. पण, आपणच आपल्याला कधी विचारतो का ???  " कशी आहेस गं तू ?" आणि म्हणूनच मी स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघितला तर....डोळ्यात पाणी तरळलं... माझं मन मला म्हणालं, "तनू , थोडा वेळ, थोडे दिवस रहा गं माझ्यासोबत!  बघ... बघ...माझ्यात किती बदल झाला आहे तो..!!! " आणि मग, त्या दिवशी मी अगदी एक वर्षाची असल्यापासूनचे फोटो काढून बघितले.  माझे हात-पाय, तो गोंडस चेहरा बघून गंमत वाटली. आईनं माझा एक लहानपणीचा फ्रॉक जपून ठेवला आहे. तो बघितला... आणि शहारलेच.. !! हातात धरला तर  तो हाताच्या कोपऱ्याला लागतो  इतका छोटा .. माझ्या घराच्या शेजारीच एक तीन / चार वर्षांचा मुलगा राहतो.  परवा माझ्या चपलेशेजारी त्यानं चप्पल ठेवली.  तेव्हा जाणवलं,  माझे पाय किती मोठे झालेत नं? हातापायाची उंची इतकी झपाट्यानं वाढत गेली की माझं मलाच जाणवलं नाही ... आपण इतके  मोठे कधी झालो ते!  मला माझे फोटो बघून वाटलं की, अरे, इतकी वर्षे आपल्या शरीराची मनाची झालेली वाढ कशी समजली नाही बुवा! 
       
 खरंच, अगदी शाळेत जाण्यापासून आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत असतो; तेव्हापासून "दुसरे कसे आहेत? ते कसे राहतात?" इथंपासून आपण तुलना करायला लागतो. ती छान दिसते नां म्हणून मीही छान दिसायला हवं.... त्यानं पेन घेतलं नं मग मलाही तस्संच हवं... इथंपासून ते तिनं ड्रेस  घेतला नां त्यापेक्षा भारी मला मिळेल का ?  इथंपर्यंत. 
आपण इतरांच्या दृष्टीला चांगलं दिसलं पाहिजे यासाठी केवढा खटाटोप करतो?? दुसऱ्यांचा आदर्श ठेवून तसं वागायचा प्रयत्न करतो....पण.... आपण स्वतःसाठी का करत नाही हा खटाटोप??? माझा हा आयडॉल आहे, यापेक्षा मला माझ्यासारखंच व्हायचंय!!! माझा आयडॉल मीच!!! असं म्हणायला हवं असं मला वाटलं. म्हणून परवापासूनच मी माईंडफुलनेसचा सराव सुरू केला. वर्तमानात जगता यावं हा त्यामागचा मुख्य हेतू .आणि तेव्हा मला स्वतःला वेळ देताना किती सुख मिळतं , मनापासून कसा आनंद घेता येतो याचं उत्तर मिळालं. स्वतःकडे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीनं बघावं तसं मी स्वतःकडे बघू लागले. स्वतःवर प्रेम करायला शिकले. मी जशी आहे तसा माझा मी स्वीकार केला आणि मला खरा खरा आनंद मिळाला. मी  स्वतःशीच भरपूर गप्पा मारल्या. त्याक्षणी जे हवं ते केलं. माझ्या इच्छा मी पूर्ण केल्या. प्रत्येक क्षण अनुभवला. आणि आता  माझ्याही नकळत स्वतःशी कधी  नातं जोडलं गेलं आणि *नात्याची वीण कधी घट्ट*विणली गेली* हे समजलंच नाही.
 
 tanmayeek8@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸हे बंध रेशमाचे🔸
लेखन- दीपा पुजारी
                
माणूस हा असा प्राणी आहे की त्याच्या मनाचा ठाव लागणं जरा अवघडच.शेवटी विधात्याने घडवलेली गोष्ट ती अगदी सहजपणे कशी उलगडणार .प्रत्येक जण  अंतरबाह्य पूर्णपणे निरनिराळा.परमेश्वराचा बगीचा आहे हा सुंदरच असणार .अगदी विलक्षण आणि विलोभनीय देखावा आहे हा.पण त्यातलं सौंदर्य पाहण्याची नजरच हवी प्रत्येककाकडे हे ही तितकेच खरे!

परमेश्वराने प्रत्येकालाच एक सुंदर आयुष्य दिलंय. प्रत्येकाचा चित्रपट अगदी वेगळा ,त्यात कोणतही साम्य नाही.अगदी प्रत्येकाचा वेगळाच.विधात्याने जन्माला घालून किती सुंदर सुंदर गोष्टी बहाल केल्या मानवाला पण खरचं  या सर्वांची जाणीव कधी आपण मनापासून ठेवतोच असे नाही होत.किती आभार मानावे त्याचे तेवढे थोडेच .पण हा विचार आपल्या मनात देखील येत नाही एवढे बिझी झालो आपण.जगात असे कितीतरी लोक आहेत त्यांना यापैकी काहीही मिळाले नाही ,पण हे कधी आपल्या ध्यानी मनी देखील येत नाही.
     
तसे आपण सगळ्याच बाजूनी धनवान .नात्याची संपत्ती देखील त्याचीच देण .ती देखील प्रत्येकाला मिळतेच असे नाही पण आपण सगळे जण या बाबतीतही अगदी सावकार च आहोत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.जीवन वेगवेगळ्या नात्यांनी कस बहारदार बनून जात .आयुष्यात अशी वेगवेगळी नाती म्हणजे पंचपक्वान्नच जणू .जेवणात जश्या वेगवेगळ्या चटण्या ,लोणची ,कोशिंबिरी जेवणाची लज्जत वाढवतात तशीच ही वेगवेगळी नाती जगण्याची गोडी वाढवून टाकतात ,फक्त साखरेसारखे त्यात विरघळून जाता आलं पाहिजे.कुटुंब म्हणलं की भांड्याला भांडे लागणं आलंच,व्यक्ती तितक्या प्रकृती ,प्रत्येकाचा स्वभाव वेगळा मत वेगळी असणारच.समोरचा माणूस चुकीचा नाही त्याची मतं आपल्या पेक्षा वेगळी आहेत हे मनाला समजावता आलं की नात स्वीकारून त्याची अवीट गोडी चाखता येणं सोपं होऊन जातं.आनंदा चे क्षण ,सण समारंभ  साजरे करताना आपली रक्ताची नाती बरोबर हवीतच ,मनातले हेवेदावे विसरून आयुष्यातील क्षण सुंदर कसे बनवायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात.हे बंध रेशमाचे घडवताना थोडं झुकून आणि थोडं माफ करून वागता आलं की नात्याचं वस्त्र कस जरतारी बनत.कुटुंब कस नात्यांनी फुललेलं असावं,प्रत्येक नात निस्वार्थ भावनांनी भरलेलं असावं सुख समृद्धी चा झरा खळखळता असावा त्यात.कुटूंबात राजकारण नसावच मुळी, लपवाछपवी,कारस्थान याला कुटुंबात स्थान नको,असावं ते निखळ प्रेम,मोकळी मन,प्रत्येक चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि आनंदी वातावरण.आपले आप्त हे परमेश्वराने दिलेली अनमोल ठेव आहे आणि तिला तितक्याच दिलदार मनाने जपुया अस प्रत्येकाला च वाटलं पाहिजे तेव्हा कुठे हा ठेवा जपला जाईल प्रत्येक पिढीकडून.तस अवघड काहीच नाही ,एकाच्या मनाच्या नादाचे झनकार दुसऱ्याच्या मनापर्यंत आपसूक पोहचले तरच ते नात चिरकाल टिकतं. सुइसोबत धागा आणि धाग्यासोबत सुई असली की नात्याचं वस्त्र भरजरी विनलं जातं यात शंकाच नाही.
            
माणसं तर सगळी रक्तामसाचीच त्यांना वेगवेगळी लेबल आपण लावतो अन्यथा परमेश्वराच्या दारी सगळे सारखेच.हातात माती जरी आली तरी त्यात सोनं शोधता आलं पाहिजे म्हणजे जीवन अगदी सुंदर बनून जाईल.तसच प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी परिपूर्ण नाही मिळत पण ज्या मिळतील त्यालाच थोडं वाकून थोडं समजावून घेऊन ,थोडं माफ करून कधीतरी माघार घेऊन ते नातं सुंदर बनवावं आणि जपावं.रुसवे फुगवे ,भांडणं, मतभेद प्रत्येकाच्या वाट्याला असतातच पण रात गई बात गई असच जगावं.नवीन दिवस उगवताना कालच्या घडलेल्या गोष्टींना तिलांजली दिली की आज किती स्वछ आणि सुंदर असेल .
         
नाती काचेसारखी पारदर्शक हवीत स्वच्छ ,सुंदर.काचेवर एक जरी ओरखडा आला तरी त्याची पारदर्शकता भग्न होते .असच नात्याचं देखील.घराघरातून निर्मळ हास्याचे झनकार कानांवर पडले की मनाला किती तृप्त वाटेल.जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात अशावेळी आपली हीच संपत्ती आहे जी खंबीर पणे पाठीशी उभी असते .आनंदाचे सोहळे ज्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांबरोबर साजरे करताना हे क्षण जसे मनाला उभारी देऊन जातात तसेच दुःखाच्या क्षणात देखील आपली हीच नातेवाईक मंडळी खंबीरपणे साथ देतात.म्हणूनच नाती जपा. इथून पुढचा काळ खूप धावपळीचा असणारे,प्रत्येकजण बिझी झालाय .धावपळीच्या या युगात आपण आपली नाती ,नातेवाईक याना कुठंतरी मागे टाकत चाललोय.पण कुटुंब मागे पडता कामा नये .नाती जपण्याची खरंच गरज आहे.परमेश्वराची ही अनमोल ठेव प्राणपणाने जपा,जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही.आपल्या लोकांसाठी थोडा वेळ काढा,एखाद्या दिवशी एकत्र जमा,सहभोजनाचा आनंद घ्या .प्रेमाची देवाणघेवाण केल्यानं ते वाढतंच. आपली माणसं हीच  आपली सम्पत्ती आहे याची जाणीव वेळोवेळी आपल्या मनाला करून द्या.आपल्या माणसात मनमोकळेपणाने वावरा, बोला.एकमेकांच्या सुखात ,दुःखात आधार द्या.नाती जपणं ही आजच्या काळाची गरज आहे, ही गोष्ट कुठंतरी लोप पावत चाललीय हीच खंत वाटते.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔸नातं माणूसकीच🔸
लेखन- सविता कोकिळ

      आज सारं विश्व एका मोठ्या संकटातून जात असताना माणूस जेवढ्या विपत्ति ना तोंड देतोय आणि अशा परिस्थितीत ही प्रत्येकजण ज्या पद्धतीने पाय रोवून उभा आहे ते पाहता कौतुक करावे तेवढे कमीच आहे.संपूर्ण जगाला या महामारीन जरी वेढलं तरी ही महामारी माणसा माणसांतल एक अढळ नातं दाखवून देतेय ते म्हणजे "नातं माणूसकीच". आज संपूर्ण जगातील घटना काही प्रसंग या नात्याला वृद्धिंगत करताना मनोमन जाणवतंय.आपण नात्यांचे विविध रंग पाहिले . माणूसकीच नात एक वेगळ्याच रंगात रंगलेल. जिकडे पहावं तिकडं सर्वसामान्य माणूस म्हणा ,पोलीस कर्मचारी म्हणा किंवा डॉक्टर ,नर्सेस सगळीकडे आज या नात्याची  इंद्रधनुशी रंगाची उधळण होताना दिसतेय.माणूसकीच हे नातच वेगळं अगदी परक्याना पण आपलंसं करणार .आज बघावं तिकडं हा माणुसकीचा झरा खळखळून वाहताना दिसतोय.अगदी गरीबातला गरीब व्यक्ती पण आपल्या परीने होईल ती मदत करायला पुढे येताना दिसतोय.ठिकठिकाणी अन्नछत्रा सारख्या सेवा चालू झालेल्या दिसू लागल्या.अगदी रस्त्यावरच्या मुक्या प्राण्याना देखील काळजी लोकं घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले.पोलीस कर्मचाऱ्यांनी अगदी दुधाच्या पिशव्या छोट्या छोट्या पिलांना फोडून दिल्या ,आपल्या शेतकरी मित्रांनी पण आपली शेतीची उत्पन्न लोकांना दान केली.लोक घरं बंद करून आपापल्या गावी गेली अशा परिस्थितीत शेजाऱ्यांना पाजार्यांनी त्यांच्या बाल्कनीतील झाडांना पाणी देऊन एक वेगळाच माणुसकीचा धडा सर्वांना दिला. मोठी श्रीमंत लोक तर मदत करतातच पण या महामारीन कानाकोपऱ्यातल्या लोकात माणूसकीच दर्शन घडवलं.माणुसकीचा किती अगाध महिमा दृष्टीस आणून दिला या महामारीने. रक्ताच्या नात्यासाठी सगळेच सरसावतात मदतीला पण माणुसकीच्या या अलौकिक नात्याने जगाला एक वेगळ्याच रूपाच दर्शन घडवलं.
          
आज ना उद्या या संकटातून आपण सगळेच सुखरूप बाहेर पडू पण उद्याच जग या महामरीतून ताऊन सुलाखून निघालेलं असेल.एक सोन्याची झळाळी घेऊन माणूसकीच वेगळं नात समभाळून  विश्व बंधुत्ववा ची भावना बरोबर घेऊन एक नवीन सतयुग जन्म घेईल यात शंकाच नाही.

savitakokil@gmail.com
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺


🔸नाते आपुले जन्माचे............विश्वासाचे🔸
लेखन- सौ.शुभांगी लेले

ही बहुतेक पु.ना.गाडगीळांची जाहीरात टी.व्ही.वर लागायची.तेव्हा झोपाळ्यावर बसलेल्या पाच पिढ्या बघताना गंमत वाटायची.
मूल जन्माला आलं कीं, त्याला लगेच नाती चिकटतात.आणि आई बाबांबरोबर या सगळ्या नात्यांची माणसाला गरज असते.एकटा माणूस जीवन जगू शकत नाही.नात्यांचीपण मोठी गंमत असते.काही नाती सतत कुरकुरणारी,तटस्थ,प्रेमाची,आपुलकीची,आंबट,गोड असतात.पण ती हवीत.त्या शिवाय गंमत नाही.या सर्व नात्यांची गुंफण रेशमाच्या कशिद्यासारखी असते."अवघा रंग एक झाला"प्रमाणे आपलही नातं मिसळून जायला हवं.नुसतं मिसळूनच नाही,तर रंगसंगतीही खुलुन दिसायला हवी.आईबाबांच नातं प्रेम,त्याग शिकवतं तर बहीणभावाचं नातं मनाला मुरड घालून दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं शिकवतं.
सगळ्यात गुरुंच नातं महत्वाचं.आपण चालत असतोच.पण कुठल्या वाटेवरुन चाललं की ध्येय गाठता येईल हे गुरु शिकवतात.जगात राम,वशिष्ठ,क्रुष्ण सांदिपनी इतकीच शिवराय दादोजी कोंडदेव,स्वामी विवेकानंद,रामक्रुष्ण परमहंसाचं नातं अनुसरणीय आहे.सावरकरांचं देशप्रेमाचं नातं जाज्ज्वल्य होतं.सर्वात जवळचं नातं मैत्रीचं.ते जपायला हवं.ही सर्व नातीतर आहेतच.पण माणसाचे निसर्गाशी असलेलं नातं महान आहे.सत्य आहे. कवयत्री इंदिरा संत म्हणतात,"मातीतून मी आले वरती,मातीचे मम अवघे जीवन."
शेवटी सर्वांचच नातं ,मातीशी आहे. म्हणून नाती जपायला हवीत कशीही असली तरीही!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
                  
नातं
लेखन- डॉ. सौ. गीतांजली आशिष दरुरे

 वाचन कट्ट्याचा लेखाचा विषय चित्कला ताईंनी सांगितला- नातं. विचार शृंखला सुरू झाली आणि कागदावर उतरवू म्हटलं तर माझा नेहमीचा पेनच  सापडेना. खूप शोधाशोध सुरू असलेली पाहून माझा मुलगा- अमेय म्हणाला, आई इतकंच ना?  माझा पेन घे,  त्यात काय?  म्हटलं, त्यात काय?  अरे, त्यात काय नाही विचार !, माझा खूप वर्षांचा सोबती आहे तो,  लाडका आहे अगदी! खास जागा आहे त्याला माझ्या मनात आणि माझ्या पर्समध्ये सुद्धा!.. हे ऐकून तो हसला. पण खरंच तो पेन माझ्यासाठी खास होता. वेगळं नातं होतं माझं त्याच्याशी आणि आज तो सापडत नसल्याने मी पुरती बेचैन होते. अखेर पेन  सापडला आणि शोध मोहीम थांबली. खुप दिवसानंतर आवडीचा एखादा नातलग भेटल्या प्रमाणे आनंद झाला. नातलग... एक निर्जीव नातलग !! वाटलं, अरे ! आपलं काय मग? असंख्य नाती जगतो आपण आयुष्यभर. काय असतं बरं हे नातं नक्की? 
      
थोर भारतीय तत्त्वज्ञानी जे., कृष्णमूर्ती म्हणतात, One  only  exsists  in Relationships !किती खरं आहे हे. नात्यांमध्येच  नात्यांसाठी आणि नात्यामुळेच अस्तित्व असतं आपलं. रक्ताच्या,  कायद्याच्या, ओळखीच्या नात्यात नसतानाही आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात. काही हलवून टाकतात आपलं जग, खळबळ माजवतात, आयुष्याला गतिमान करतात, निरसपणा दूर करतात, काही हसवतात,  काही रडवतात, न पुसता येणारी अगदी पक्की छाप मनावर उठून आठवणींचा खजिना बहाल करून निघूनही जातात.... अगदी दूर... कधी आपण काही गोष्टींनी त्यांच्यापासून दुरावतो.. कधी काही तशीच राहतात साथ देत.. अगदी अखेरपर्यंत !!
      
किती विविध रूपांमधील उदाहरण तरी त्यांची.. आई-वडील मुलं, पती-पत्नी,  भाऊ-बहीण, गुरु शिष्य,  मित्र-मैत्रिणी, मामा -मावशी- आत्या आणि भाचे कंपनी, आजी आजोबा नातवंड, प्रियकर-प्रेयसी, सख्खे शेजारी,व्यवसायानिमित्ताने जुळलेले नाते. नाते जन्मभूमीशी,  कर्मभूमीशी, निसर्गाशी,  पाळीव प्राण्यांशी, नाते माणुसकीशी,  नाते भक्ताचे ईश्वराशी आणि सध्या इन्स्टंटच्या जमान्यात इंटरनेटमुळे जुळणारे अगदी आधुनिक ऑनलाइन आभासी नाते... एक ना दोन.. किती हे प्रकार!
      
असे म्हणतात की, प्रत्येक वस्तूचा, व्यक्तीचा एक ऑरा असतो. काही खास लहरी, व्हायब्रेशन्स असतात. या जिथे ज्याच्यापाशी जुळतात तिथे नात्याची सुरुवात होते.
 मला तर वाटतं हा नियम इतर वस्तूंना, अगदी खाद्यपदार्थांना ही लागू होत असेल. असेल का? बघा ना- पाटी म्हटलं की पेन्सिल, बॅट म्हणलं की बॉल, पोळपाट म्हटलं की लाटणं, छोले म्हटलं की भटुरे, झुणका म्हटलं की भाकरी! एकाचं नाव घेतलं की दुसरी वस्तू डोळ्यासमोर अवचीत आलीच म्हणून समजा. 
        
माझ्यामते नातं कोणताही असो- प्रेम, समाधान, आनंद, भावनिक मानसिक सुरक्षितता, पाठबळ, त्रास, मनस्ताप, हुरहुर, खेद, काळजी, कधी अभिमान यातील काही तरी नक्कीच देते. मनस्ताप मिळाला तर मागे टाकून पुढे जायचं. समाधान, आनंद देणार्‍यां नात्यांना मनापासुन जपायच. पूर्वग्रह न ठेवता मनाची दालन सर्वांसाठी मुक्त ठेवून नात्यांच स्वागत करायचं. विनातक्रार, डोळसपणे नातं स्वीकारायचं योग्य प्रतिसाद देत, अतिक्रमण न होऊ देता, स्पेस जपत, नात्यात दरी पडू न देता ते अधिकाधिक फुलवण  शेवटी आपल्याच हाती आहे. हो ना? आणि अशा या नात्यावर सुचलेली एक कविता...
                 
नातं- कधी नकळत, कधी उमजून जुळलेलं.
कधी व्यक्त कधी अव्यक्त शब्दाविण जाणलेलं.
नातं- कधी अल्लड, कधी हळव अन् शहाणही 
कधी पोक्त, निखळ, प्रेमळ जपलेलं मनी...
नातं- कधी बोलकी तर कधी अबोल
कधी हसरं, तर कधी उदास,  निरस, रुसव
नातं- कधी बिलगणार कधी दुरावणार
कधी लाडिक, लडिवाळ
कधी उथळ, कधी खोल मुरलेलं उरी 
नातं- एक सुरेख, रेशमी बंधन ज्याला विश्वास अन् जिव्हाळ्याचे कोंदण. 
हा अंतरीचा जिव्हाळा विश्वास नातं गुंफणारे धागेच. 
पण आजच्या मोहमयी मायाजालात आभास नात्यांचे. 
फोलपणा आभासी विश्वातील मृगजळी नात्यांचा वेळीच आहे ओळखायचा..
आभासी जगातून परत जाणिवांकडं फिरूया
गर्द हिरव्या नात्यांनी पुन्हा नव्याने जगूया.
कधी अलिप्त राहून स्वतःशी  ही नातं जोडूया. 
कधी अलिप्त राहून स्वतःशी ही नातं जोडूया. 
    
 geetadarure@gmail.com

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मायबोली_इचलकरंजी

No comments:

Post a Comment